आपले आयुष्य हे एका चित्रपटासारखे असते. जिथे सुरुवात-मध्यंतर आणि शेवट असतो. संधी म्हणून प्राप्त झालेले जीवन एकदाच असते, त्यामुळे त्याची अनुभूती ही घेणे हा जगण्याचा मूळ गाभा आहे. चांगल्या-वाईट घटना आयुष्यात होणे हा विधात्याचा नियम आहे,त्यामुळे आशिष निनगुरकर यांच्या ‘अग्निदिव्य’ या चरित्र पुस्तकातून रमाबाई कांबळे यांचा जीवनपट वाचतांना डोळ्यासमोर सिनेमा उभा राहतो आणि हाच प्रवास आपल्याला नवी ऊर्जा देतो. त्यामुळे ही वास्तव जगाची चित्तरगाथा आपल्याला खूप काही देणारी असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी केले.
येथील युवालेखक आशिष निनगुरकर यांच्या चपराक प्रकाशन निर्मित नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘अग्निदिव्य’या पुस्तकाच्या स्वागतासंदर्भात राजदत्तजी बोलत होते.यावेळी प्रसिद्ध अभिनेते सुनील बर्वे,संकलक भक्ती मायाळू व इतर मान्यवर उपस्थित होते. नुकताच केंद्र सरकारतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘पद्मभूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या या तपस्वी दिग्दर्शकाचे कौतुक करायला ही सर्व मंडळी जमली होती. यावेळी युवालेखक आशिष निनगुरकर देखील उपस्थित होते.
या छोटेखानी कार्यक्रमात आशिष यांच्या नव्या ‘अग्निदिव्य’ पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. दिग्दर्शक राजदत्तजी यांचा अभिनेते सुनील बर्वे यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी लेखक आशिष निनगुरकर यांनी त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘अग्निदिव्य’ पुस्तकाची वास्तवगाथा कथन केली. एका महिलेच्या आयुष्यात-संसारात कुठल्या घटना घडू शकतात हे या पुस्तकातून अगदी बारकाईने मांडले आहे. कुणाचेच आयुष्य साधे-सरळ नसते,त्यात अनेक छटा त्यात असतात.हेच या पुस्तकातून सखोलरित्या विशद केले आहे.
पुस्तके आपल्याला खूप काही देऊन जातात. पुस्तकांमुळे आपले आयुष्य पूर्णतः बदलून जाते. तेच आपले सख्खे जिवाभावाचे मित्र बनतात.त्यामुळे आशिषच्या या नव्या पुस्तकाचे अभिनेते सुनील बर्वे यांनी स्वागत केले. आशिषचे पहिले पुस्तक आमच्या ‘हरबेरियम’ उपक्रमावर होते. त्यावेळी आशिषची मोलाची मदत झाली होती. असे अभिनेते सुनील बर्वे यांनी सांगितले. चपराक प्रकाशनातर्फे नुकतेच आशिष यांचे ‘अग्निदिव्य’ हे चरित्र पुस्तक नुकतेच बाजारात दाखल झाले आहे. या पुस्तकाचे कौतुक अनेक दिग्गज मान्यवरांकडून होत आहे. सूत्रसंचालन केदार भारती तर आभार आकाश देसाई यांनी मानले.