नववी ते बारावीचे वर्ग नियमित सुरू झाल्यानंतर शिक्षण विभागाने पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. शालेय शिक्षणाच्या पावलावर पाऊल टाकत उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडूनही महाविद्यालये सुरू करण्याचा विचार सुरू झाला आहे. राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय महिनाअखेरपर्यंत होण्याचे संकेत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले.
राज्यामध्ये योग्य ती काळजी घेत टप्प्याटप्याने शाळा सुरू होत आहेत. त्यामुळे आता महाविद्यालये सुरू करण्यात यावीत अशी मागणी सर्वच स्तरावरून होत आहे. सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी विज्ञान, अभियांत्रिकी शाखांमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना प्रात्याक्षिक शिक्षण महत्त्वाचे असते. तसेच पीएचडी, पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांनाही ऑफलाइन मार्गदर्शन, सर्वेक्षण, निरिक्षण करणे आवश्यक असते. याचा विचार करून राज्यातील महाविद्यालयेही टप्प्याटप्याने सुरू करण्याचा विचार सुरू असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. ५० टक्के उपस्थितीत महाविद्यालये सुरू करणे, घ्यावयाची काळजी यासंदर्भात आम्ही अभ्यास केला असून, महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भातील प्रस्तावावर लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होईल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीचे लाभ
जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यास विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे प्रमाणपत्र न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी खुल्या प्रवर्गातून अर्ज केले आहेत. अशा विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केल्यावर त्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीचे लाभ देण्यात येणार आहेत. यामुळे त्यांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही असेही सामंत यांनी सांगितले.