मुंबईच्या रविंद्र नाट्य मंदिरात कोकणच्या मनसे कार्यकर्त्यांसाठी एक खास मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘कोकणातल्या कंत्राटदारांना मनसे पद्धतीनं जाब विचारा’, असं म्हणत कोकणातील लोकांनी जमिनीवर आणि समुद्रावर लक्ष ठेवावं’, असा संदेशही दिला. ‘कोकणानं महाराष्ट्राला भारतरत्न मिळवलेल्या व्यक्ती दिल्या, कलाकार दिले, नावाजलेले पत्रकार दिले. मात्र, आम्ही काय करतोय गणपतीपुरतं कोकणात येतोय. वाडी-बिडी बघायची आणि परत यायचं. यापलीकडे कोकणात तुम्ही काय बघता?’, असा थेट सवाल यावेळी राज ठाकरे यांनी कोकणवासीयांना केला. याच कार्यक्रमात राज यांनी कोकणातले प्रश्न, उद्योग, रस्ते समस्या यांसारख्या प्रश्नांचाही समाचार घेताना. तर दुसरीकडे त्यांनी आंबेनळी घाटात झालेल्या अपघातात मदत करणाऱ्या महाबळेश्वर ट्रेकर्स, सह्याद्री ट्रेकर्स आणि सी स्केप महाड ट्रेकर्स यांचं कौतुक करत त्यांचा सत्कारही केला. ‘कोकणातील माणसं कोकणातल्या घाटासारखी आहेत. अनेकदा आढेवेढे घेतात पण बोलण्यात त्यांच्या नादी लागू नये.’ अशी समजही राज यांनी यावेळी दिली.
कोकणवासीयांना ‘पर्यायाची’ गरज
कोकणात अनेक प्रकल्प येत आहेत. या प्रकल्पांना विरोध करताना राज ठाकरे यांनी ‘हे सर्व प्रकल्प कोकणाची वाट लावणारे आहेत. या प्रकल्पाना दुसरीकडे न्या’, असं मत व्यक्त केलं. ‘या प्रकल्पांसाठी कोकणाच्या जमिनीची गरज नाही. त्यापेक्षा कोकणात पर्यटनला चालना द्या’, असंही ते म्हणाले. ‘केरळमध्ये पावसाने धुमाकूळ घातला. केरळची भूमी कोकणासारखीच आहे पण केरळ पर्यटनात किती पुढे गेलाय. यासाठी राजकीय बळ लागतं. कोकणातल्या लोकांना पर्यायाची गरज आहे’, असा टोला राज यांनी शिवसेनेचं नाव न घेता त्यांना लगावला आहे. ‘कोकणातले नवे रस्ते उखडलेलेच आहेत. तिथल्या कंत्राटदारांना तुम्ही जाब विचारला पाहिजे. नाशिकचे कंत्राटदार राज ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना घाबरून असायचे म्हणून तिथल्या रस्त्यांवर खड्डे नाहीत. त्यामुळे कोकणातल्या कंत्राटदारांना तुम्ही मनसे स्टाईलने जाब विचारला पाहिजे’, असंही राज ठाकरे म्हणाले.
वाचा : ईव्हीएम मशीन बंदीवर राज ठाकरेचं उद्धव ठाकरेंना पत्र
कोकणातील मनसेची ताकद वाढवा
‘गणपतीला गावी जाताना तुमच्या गावातल्या मनसैनिकाला बळ द्या. तसंच कोकणात प्रत्येक गावात मनसेची शाखा सुरू करा’, असं आवाहन राज ठाकरे यांनी कोकणातल्या मनसे कार्यकर्त्यांना केलं. ‘मनसे’च्या स्थापनेनंतर पक्षाला कोकणातून (खेडमधून) पहिलं यश मिळालं. त्यामुळे कोकणातूनच पुढच्या यशाची सुरुवात होईल’, असा विश्वास यावेळी राज ठाकरे यांनी कोकण मनसैनिकांनवर दाखवला. ‘कोकणात देवदेवस्कीसारखे प्रकार होतात असा अनेकांचा समज आहे. मात्र चेटूक बिटूक काही नसतं. परमेश्वराला माना आणि गणपती बाप्पाचा आशिर्वाद घेऊन मनसेची कोकणातील ताकद वाढवा’, असा सल्ला राज यांनी यावेळी कोकणवासीयांनी दिला.