मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि पालिकेने कोरोनासंदर्भातील नियम अधिक कडक करण्यास सुरुवात केली आहे. सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मास्क न घालणाऱ्या व्यक्तींकडून दंड आकारण्यात येत आहे. तसेच आता कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ नये यासाठी इमारतीही सील करण्यात येत आहेत. शुक्रवारी चेंबूर येथे पाच किंवा त्यापेक्षा अधिक कोरोना रुग्ण असलेल्या चार इमारती सील करण्यात आल्या आहेत.
इमारतीबाहेर जाण्यास मनाई
सदर इमारतींमधील रहिवाशांना तब्बल १४ दिवस इमारतीबाहेर ये-जा करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच नोकरीसाठीही घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. खाद्यपदार्थ ऑनलाईन मागवावे लागणार आहेत. कोरोनाबाबत शासन व पालिकेने जे काही नियम घालून दिले आहेत, त्यांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. मात्र, कोरोनाबाबत नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर पालिकेतर्फे कडक कारवाई करण्यात येणार आहे.
‘या’ इमारती केल्या सील
मुंबईतील काही भागात १ फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे पालिकेने त्याची गंभीर दखल घेऊन चेंबूर परिसरातील ५५० इमारतींना कोरोनासंदर्भातील नियम न पाळल्यास जबाबदार नागरिकांवर कारवाई करू, असा इशारा दिला होता. मात्र, काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याने चेंबूर मैत्री पार्क येथील सफल हाईट, चेंबूर पोलीस ठाण्यासमोरील नवजीवन सोसायटी, सिंधी सोसायटी बंगला क्र. १३ मधील साई त्रिशूल आणि आरसी मार्ग मारवली गावाजवळ शिवधाम सोसायटी येथे प्रत्येक इमारतीत कोरोनाचे पाचपेक्षाही जास्त रुग्ण आढळून आल्याने पालिकेने तातडीने सदर चार इमारती सील केल्या.