अंबरनाथ ( प ) येथील हनुमान नगर या झोपडपट्टीत महावितरण कंपनीने विद्युत जोडणीचे काम केले. मात्र, काही घरांच्यामध्ये खूप जास्त अंतर असल्याने सर्व्हिस वायर खाली लोंबकळत आहे. लहान मुले या वायरला काठीने खेचण्याचा जीवघेणा खेळ खेळत असतात. हा धोकादायक प्रकार त्वरित थांबविण्यात यावा व अतिरिक्त पोल टाकण्यात यावे, अशी मागणी सामाजिक संघटनेने केल्यानंतर गुरुवारी महावितरण कंपनीच्या अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन विद्युत समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.
अंबरनाथ ( प ) येथील फॉरेस्ट नाका आणि हनूमान या झोपडपट्टीत अत्यावश्यक विद्युत पोल बसविण्यात यावे अशी 2008 मध्ये आस्ताना मेहबुबे सुबहानी या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अब्दुल सत्तार वणू यांनी महावितरणकडे केली होती. संस्थेच्या पाठपुराव्यानंतर महावितरणकडून नवीन पोल मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी 4 पोल हनुमाननगर याठिकाणी 28 फेब्रुवारी 2015 रोजी बसविण्यात आलेले आहेत आणि उर्वरित पोल बसविण्याचे राहिलेले होते. हा झोपडपट्टीचा असल्याने सदर ठिकाणी आणखीन नवीन 6 पोल तातडीने बसविण्यात यावे, अशी मागणी संस्थेच्यावतीने मुख्य कार्यकारी अभियंता व अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्याकडे नुकतीच करण्यात आलेली आहे.
या परिसरातील पुढील भागात राहणार्या नागरिकांनी विद्युत जोडणी करून घेतलेली आहे. येथील घरांमध्ये अंतर खूपच जास्त पडत असल्याने विजेच्या सर्व्हिस वायरी लोंबकळत आहे. त्यामुळे वायरीला लहान मुले काठीने खेचत असतात. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब संस्थेचे नवाज वणू, अरविंद जैस्वाल, प्रकाश गायकवाड, पंढरी जाधव, मोहन पवार, अब्दुल रहीम बादशाह शेख, हकीम शेख, केरू चितोडीया, मोहिनुद्दीन वणू व स्थानिक रहिवाशांनी महावितरण कंपनीच्या निदर्शनास आणून दिली होती. या प्रकरणाची गांभीर्याने घेत अतिरिक्त कार्यकारी अभियंता लठ्ठा व कनिष्ठ अभियंता हरड यांनी तातडीने परिसरात येऊन पाहणी केली व येथील विद्युतची समस्या तातडीने सोडविण्याचे आदेश संबंधित अधिकार्यांना दिले आहेेेत.