विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा हे आमचे प्रमुख ध्येय आहे. त्यामुळे सध्या राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत असला तरी राज्यातील शाळा दिवाळीनंतरच सुरू करण्याचा आमचा विचार आहे. तसेच अकरावी प्रवेशाबाबत लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक घेऊन विद्यार्थी हिताचा निर्णय घेतील असे आश्वासन शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिले.
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून राज्यामध्ये टप्प्याटप्प्याने शाळेतील वर्ग सुरू करण्यात येणार आहे. इयत्ता नववी ते बारावीचे विद्यार्थी हे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सजग असतात आणि त्यांचे महत्वाचे शैक्षणिक वर्ष असल्याने या वर्गांची शाळा सुरू करताना प्रामुख्याने विचार केला जाईल. सरसकटपणे शाळा सुरू करून विद्यार्थी व शिक्षकांच्या आरोग्याशी सरकार खेळणार नाही व त्यांचे आरोग्य धोक्यात घालणार नाही. अकरावी प्रवेश प्रक्रिया मराठा आंदोलनांच्या न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्यामुळे वेळ लागत आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच बैठक घेऊन विद्यार्थी हिताचा निर्णय घेतील अशी माहिती गायकवाड यांनी दिली.
केंद्र व राज्य सरकारने निर्धारित केलेल्या आरोग्यविषयक सर्व सूचनांचे व खबरदारीचे उपाय करूनच स्थानिक पातळीवर शैक्षणिक संस्थांना शाळा सुरू करण्याची परवानगी दिली जाईल. शिक्षण हक्क कायद्याच्यानुसार सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण हे मिळालेच पाहिजे. कोरोनाच्या प्रादुर्भावाने पालकांची आर्थिक परिस्थिती दयनीय झाली असल्याने त्यांना टप्पाटप्प्यात शुल्क भरण्याची मुभा दिली आहे. विद्यार्थी शुल्क भरुन शकला नाही तरी शाळा अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवू शकत नाही. शाळा प्रशासनाने विद्यार्थियांना शिक्षणापासून वंचित ठेवले तर अशा शाळांवर कारवाई केली जाईल, असा इशारा शिक्षण मंत्र्यांनी दिला. अशा शाळांविरूद्ध स्थानिक शिक्षण अधिकार्यांकडे तक्रार करण्याचे आवाहन पालकांना करण्यात आले आहे.