मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महत्वाची कामगिरी बजावणारी ‘बेस्ट’ गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात आहे. आजच्या तारखेला ‘बेस्ट’वर सुमारे १,१०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. दरम्यान, मुंबईच्या रस्ते वाहतुकीचा ‘कणा’ असलेल्या ‘बेस्ट’ने या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी मुंबई महानगर पालिकेकडून २०१५ साली १,६०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, वाहनांची वाढती संख्या, खासगी टॅक्सी सेवांचे आव्हान, इंधनाचे वाढते दर आणि इतर कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून ‘बेस्ट’ ची हालत आजही जैसे थे आहे. ‘अशा परिस्थितीत मुंबईतील ‘बेस्ट’ ला वाचविण्यासाठी केंद्र सरकारने २ हजार कोटींची आर्थिक मदत करावी’, अशी मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर, ‘आर्थिक संकटात सापडलेल्या मुंबईच्या ‘बेस्ट’ला केंद्र सरकारने २ हजार कोटींचे विशेष पॅकेज द्यावे’, अशी लेखी मागणी शेवाळे यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली आहे.
याशिवाय मुंबईच्या विकास आराखड्यासाठी १४ लाख ६०० कोटींच्या पॅकेजची मागणीदेखील करण्यात आली आहे.
मुंबईच्या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी, केंद्र सरकारने ‘मुंबई विकास आराखडा अंमलबजावणी प्राधिकरण’ स्थापन करून, १४ लाख ६०० कोटींचे विशेष पॅकेज मुंबईला द्यावे, अशी मागणी खासदार शेवाळे यांनी केली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असूनही ‘बेस्ट’ ही स्वायत्त संस्था आहे. पालिकेने याआधीच १,६०० कोटींचे कर्ज देऊन ‘बेस्ट’ चा आर्थिक डोलारा सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, आराटीआयच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार ‘बेस्ट’ला दररोज सुमारे २ कोटींचा तोटा सहन करावा लागतो आहे.अशा परिस्थितीत केंद्र सरकारने विशेष पॅकेजची तरतूद केल्यास बेस्ट या आर्थिक संकटातून बाहेर पडू शकेल.– राहुल शेवाळे, खासदार, दक्षिण- मध्य मुंबई