माथाडी, हमालांवर अन्याय होत असल्यामुळे मंगळवारी राज्यातील बाजार समितींनी बंद पुकारला होता. अखेर या बंदची दखल घेत राज्य सरकारने महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) तिसरी सुधारणा विधेयक २०१८ मागे घेतले. हे विधेयक मागे घेतल्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी विधान परिषदेत जाहीर केले. सरकारकडून माथाडी कायदा व मंडळांचे अस्तित्व संपविण्याचे षड्यंत्र रचल्याचा आरोप करत माथाडी कायद्याविरोधात मंगळवारी राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीने बंद पुकारला होता. त्यामुळे सरकारवर हे विधेयक मागे घ्यावे लागले.
सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण
मनाला वाटेल तेव्हा सरकार विधेयक आणतात आणि मनाला वाटेल तेव्हा विधेयक मागे घेत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. हे सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याचे देखील त्यांनी म्हटलं आहे. माथाडीबाबतचे विधेयक चुकीचे आहे, असे यापूर्वीच सांगितले होते, याची आठवण धनंजय मुंडे यांनी करुन दिली आहे.