लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता मार्च महिन्यात कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. या आचारसंहितेच्या भीतीपोटी सध्या पनवेल मध्ये विकासकामांचा धूम धडाका सुरू आहे. दररोज पालिका क्षेत्रात विविध ठिकाणी विकासकामांची उद्घाटने सुरू आहेत.
मागील आठवडाभरापासून सत्ताधारी भाजप आणि शेकाप मार्फत विविध ठिकाणी विकासकामांची उद्घाटने केले जात आहे. नुकतेच एका उद्घटनाप्रसंगी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत चार विकासकामांच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम सत्ताधारी भाजपकडून ठेवण्यात आला होता. यामध्ये मनपा हद्दीतील गावांना पथदिवे बसविण्याच्या कामाचे उद्घाटन, वडाळे तलावाचे सुशोभीकरणाच्या कामाचे उद्घाटन, पनवेल रेल्वे स्थानकाजवळील रस्त्याचे काँक्रीटीकरण, समाज मंदिराच्या उद्घाटन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण, मराठी कन्या शाळेचे बांधकाम आदी कामांचे रविवारी उद्घाटन करण्यात आले.
लोकसभेच्या निवडणुकी पाठोपाठ विधानसभेची निवडणूक देखील जाहीर होणार असल्याने पालिकेमार्फत केलेल्या कामांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्याचे भाजपने ठरवले आहे. मात्र विरोधीपक्ष शेकापकडूनही या सर्व विकासकांच्या उद्घाटनांची होर्डिंग्स, बॅनर्स अनेक ठिकाणी लावण्यात आली आहेत. विशेष म्हणजे शहरातील वडाळे तलाव आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा सुशोभीकरणाच्या कामावरून जोरदार राजकारण सुरू झाले आहे. विरोधीपक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी या कामाचे श्रेय स्वतःकडे घेतले आहे. मागील अनेक वर्षापासून यासंदर्भात आम्ही पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आचारसंहितेच्या भीतीपोटी मागील आठवड्यात सुमारे तीन वेळा स्थायी समितीची बैठक पार पडली . तीस पेक्षा जास्त विकासकामांना या स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. आचारसंहिता जाहीर झाल्यावर संबंधित कामांचे श्रेय लोकप्रतिनिधींना घेता येणार नसल्याने सध्याच्या घडीला आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी उद्घाटनांचा जोरदार खटाटोप लोकप्रतिनिधींकडून सुरू आहे.