मध्यरेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर लिंबू सरबत आणि कालाखट्ट्यावर घालण्यात आलेल्या बंदीनंतर प्लॅटफॉर्मवर खुलेआम विकल्या जाणार्या वडापाव आणि रगडापुरीवरही आता आफत येण्याची शक्यता आहे. हे पदार्थही अत्यंत सुमार पध्दतीने बनवले जात असल्याच्या तक्रारी रेल्वे प्रशासनाकडे येऊ लागल्याने रेल्वेने हे पदार्थ प्लॅटफॉर्मवर विकण्यास प्रतिबंध घालण्याची तयारी रेल्वेने सुरू केली आहे. पोटाची खळगी मध्यरात्रीपर्यंत भरणार्या या पदार्थांवर बंदी घातल्यास गरीब प्रवाशांना त्याची झळ पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे याविरोधात वातावरण तयार होऊ लागले आहे.
मध्यरेल्वेच्या कुर्ला स्थानकातील लिंबू सरबत बनविण्याचाआक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अवघ्या मुंबईत एकच खळबळ उडाली होती. उसळलेल्या जनक्षोभानंतर झोपी गेलेल्या मध्य रेल्वेला जाग आली. तात्काळ मध्यरेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरील फूड स्टाल्सवर मिळणार्या लिंबू सरबत आणि कालाखट्टावर तात्काळ बंदी घालण्यात आली. लिंबू सरबत आणि कालखट्टाप्रमाणेच मध्य रेल्वेच्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर अतिशय घाणेरड्या पद्धतीने रगडा आणि वडापावर तयार करून विकला जात असल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. यासंबंधीच्या असंख्य तक्रारी रेल्वे प्रशासनाकडे आल्या आहेत.
या तक्रारींची गंभीर दखल रेल्वे प्रशासनाने घेतली आहे. वडापाव आणि रगडा पुरीसारखे सुमार दर्जाच्या पदार्थांची विक्री होऊन विषबाधा होण्याची शक्यता लक्षात घेऊन या पदार्थांची विक्रीच बंद करून त्या जागी पॅकिंग केलेले पदार्थ विकण्यास मान्यता देण्याची रेल्वेची तयारी आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई तातडीने केली जाऊ शकते.
याबाबत मध्यरेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी ए.के.जैन यांकडे विचारणा केली असता त्यांनी असा निर्णय अजून झाला नसल्याचे स्पष्ट केले. पण खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर विकल्या जाणार्या या पदार्थांच्या दर्जाबाबत तक्रारी येतात हे खरे आहे, असे म्हटले.
कुर्ला स्थानकातील लिंबू सरबत व्हिडियो वायर होताच रेल्वे प्रशासनाला जाग येते रेल्वेच्या खाद्यपदार्थाच्या स्टॉलवरील लिंबू सरबत बंद केले आहे . मात्र हा काही पर्याय नाही. रेल्वेत वार्षिक ३ हजार रेल्वे अपघात होतात, म्हणून रेल्वेने गाड्या चालवणे बंद केले काय? लिंबू सरबत बंद करण्याऐवजी प्रवाशांना चांगली सुविधा कशी देता येईल, याचा विचार करायला हवा होता.
सुभाष गुप्ता – अध्यक्ष रेल यात्री परिषद