घरमुंबईLok Sabha 2024 : दासबोधाचा आधार घेत चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

Lok Sabha 2024 : दासबोधाचा आधार घेत चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

Subscribe

उद्धव ठाकरे यांनी आता एक लक्षात ठेवावे की, त्यांनी मोदी आणि फडणवीस यांच्याबद्दल कितीही वायफळ बडबड केली तरी, 4 जून रोजी जनता त्यांना तोंड दाखवायलाही जागा ठेवणार नाही, असा दावा बावनकुळे केला.

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल, सोमवारी सोलापुरात झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्या ‘दासबोध’चा आधार घेत उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. (Lok Sabha Election 2024: Bawankule hits back at Uddhav Thackeray for criticizing Modi and Fadnavis)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सोमवारी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लक्ष्य केले होते. कमळाबाईचे नेते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात येऊन गेले. सध्या मोदी महाराष्ट्रासह देशभरात फिरत आहेत. 2014पासून लोकांच्या कोपराला गुळ लावण्याचे काम ते करत आहेत. 2014ला 2019 चा गुळ लावला, 2019ला 2024 चा गुळ लावला आणि आता 2024ला 2047चा गुळ लावत आहेत, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

- Advertisement -

तर, टरबूजाचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. देवेंद्र फडणवीस यांचे काय करायचे, हे तुम्हा मतदारांना माहीत आहे. पण टरबूज हे उन्हाळ्यात कामी येते. पण हे (देवेंद्र फडणवीस) टरबूज नाहीत, ते दिवाळीत पायाखाली चिरडले जाणारे चिराटे आहेत. आले तेव्हा मुख्यमंत्री होते, पण आता पाव उपमुख्यमंत्री झाले, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर शरसंधान केले.

- Advertisement -

भाजपा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करत याला प्रत्युत्तर दिले आहे. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांचा पुन्हा तोल गेलाच. उद्धव ठाकरे यांनी कितीही शिव्याशाप दिले तरी जनता जनार्दनाचे आशीर्वाद फडणवीस यांच्यासोबत आहेत. उद्धव ठाकरे यांनी आता एक लक्षात ठेवावे की, तुम्ही मोदी आणि फडणवीस यांच्याबद्दल कितीही वायफळ बडबड केली तरी, 4 जून रोजी जनता तुम्हाला तोंड दाखवायलाही जागा ठेवणार नाही, असा दावा त्यांनी केला.

खरंतर, समर्थ रामदास स्वामी यांनी उत्तम लक्षणे सांगताना लिहून ठेवले आहे – ‘तोंडाळासीं भांडों नये | वाचाळासीं तंडोंनये | संतसंग खंडूं नये | अंतर्यामीं ||’ पण उद्धव ठाकरे यांचा वाचाळपणा काही थांबायचे नाव घेत नाही. अडीच वर्षे घरात बसून काढली, बोलण्यासाठी एक विकासकामही केले नाही. मग लोकांसमोर गेल्यावर अशी मुक्ताफळे उधळण्याची वेळ येते, असे सांगतानाच बावनकुळे यांनी म्हटले आहे की, उद्धव ठाकरे हे आता नैराश्याच्या गर्तेत गेले आहेत. त्यांची ही वायफळ बडबड त्यांच्या पक्षातील उमेदवारांना आणि नेत्यांना सुद्धा नकोशी झाली आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : निवडणूक आयोग भाजपाची धुणीभांडी करतोय काय? ठाकरे गटाचा बोचरा सवाल


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -