आमदार प्रताप सरनाईक यांनी गेली 9 वर्षे पाठपुरावा केलेला वर्तक नगर पोलीस वसाहतीचा प्रश्न मार्गी लावण्यात आपणाला यश आले आहे. मंगळवारी झालेल्या निर्णयानुसार या पोलीस वसाहतीचा पुन:र्विकास म्हाडाच्या माध्यमातून करण्यात येणार असून आगामी तीन वर्षात या इमारतींचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली.
वर्तकनगर मधील पोलीस वसाहतींचा प्रश्न अखेरीस मार्गी लावला. पोलीस वसाहतींच्या सर्व इमारतींचा पुनर्विकास म्हाडा करणार असा निर्णय बैठकीत झाला. बैठकीला आमदार श्री.प्रताप सरनाईक, सचिव श्री.श्रीनिवासन, गृहसचिव श्री.कुंटे व म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. डिग्गीकर हे उपस्थित होते pic.twitter.com/02QDi3JHSj
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 15, 2020
दरम्यान, गेली 9 वर्षे तीन सरकारांकडे पाठपुरावा केल्यानंतर डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे गेलेला हा प्रश्न त्यांनी अवघ्या पहिल्याच बैठकीत मार्गी लागला. डॉ. आव्हाडामुळेच पोलीस कुटुंबियांना न्याय मिळाला, याचा आपणाला अभिमान आहे, असे गौरवोद्घार ओवळा-माजीवड्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी यावेळी काढले. गेली अनेक वर्षे रखडलेला वर्तक नगर येथील पोलीस वसाहतीच्या पुन:र्वसनाचा प्रश्न गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी अवघ्या एकाच बैठकीत निकाली काढला आहे. या संदर्भातील माहिती देण्यासाठी बोलावल्या पत्रकार परिषदेत डॉ. आव्हाड आणि आ. सरनाईक बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मा. खा. आनंद परांजपे हेदेखील उपस्थित होते.
गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, गेली अनेक वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून आ. प्रताप सरनाईक वर्तकनगर पोलीस वसाहतीच्या पुन:र्विकासासाठी पाठपुरावा करीत होते. त्यांनी आपणाशी चर्चा केल्यानंतर आपण हा प्रश्न धसास लावला. योगायोगाने आपण सदर खात्याचे मंत्री असल्याने त्यांच्या या पाठपुराव्याला पूर्णविराम लावणे मला शक्य झाले. हा पुन:र्विकास कोणी करावा, या मुद्यावर अनेकांचा विरोध होता. मात्र, आपण हा विरोध झुगारुन सदरचा भूखंड हा म्हाडाचा असल्याने म्हाडाच्या वतीनेच पुन:र्विकास करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार 567 घरे ही पोलिसांना देण्यात येणार असून उर्वरित घरांपैकी आणखी 10 टक्के घरे पोलिसांसाठीच राखीव ठेवण्यात येणार आहेत. तसेच, अन्य 10 टक्के घरे ही शासकीय कर्मचार्यांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.
लवकरच या पुन:र्विकासासाठी वास्तूविशारद- अभियंते यांच्यासोबत आराखडा तयार करुन आगामी तीन वर्षात हे काम पूर्णत्वास नेण्यात येणार आहे. यावेळी आ. सरनाईक यांनी, गेल्या 9 वर्षांपासून आपण वर्तक नगरमधील पोलीस वसाहतीच्या पुन:र्विकासासाठी प्रयत्नशील होतो. इमारती धोकादायक झाल्यामुळे येथील अनेक कुटुंबांचे रेंटल हाऊसिंगमध्ये स्थलांतर करण्यात आलेला आहे. फडणवीस सरकारच्या काळातही आश्वासने देण्यात आली होती. मात्र, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याशी महिन्याभरापूर्वी पत्रव्यवहार केला. त्यांनीही म्हाडा आणि गृहखात्याची संयुक्त बैठक बोलावून हा प्रश्न तत्काळ मार्गी लावला. एकाच बैठकीमध्ये त्यांनी येथील पुन:र्विकासाला मान्यता दिली. या ठिकाणी डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांसाठी गेस्ट हाऊस, हॉल, क्लब हाऊस आदींची व्यवस्था करावी, अशी मागणी केली. दरम्यान, आ. सरनाईक यांच्यावतीने यशवंतराव चव्हाण यांचे चित्रशिल्प देऊन डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. तसेच, या वसाहतीमध्ये राहणार्या पोलिसांच्याा पत्नींनीदेखील डॉ. आव्हाड यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.