कोकणातील महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध कायम असून नाणारवासियांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळत आहे. प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात नाणारवासीयांनी आज आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. तसेच मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नसल्याची घोषणा विरोधी संघर्ष संघटनेने केली आहे. मात्र रात्रीच्या वेळेत मैदानात थांबता येत नसल्याने या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाचा – नाणार प्रकल्प लादणार नाही – मुख्यमंत्री
संघटनेचा आरोप
सलग पाचव्या अधिवेशनात हजारोंच्या संख्येने आलेल्या आंदोलकांसोबत चर्चा करण्यास मुख्यमंत्री तयार नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. मुख्यमंत्र्यांनी नाणारवायिसांचा विरोध समजून घेत जबरदस्तीने प्रकल्प लादणार नसल्याची ग्वाही दिली होती. मात्र तरीही देखील काही एनजीओ मार्फत दलाल आणि गुंडाची मदत घेत हा नाणार प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय संघटनेने आरोप केला आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार नितेश राणे, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांसह विविध नेते आज या व्यासपीठावर आले होते.
वाचा – नाणार प्रकल्प रद्द झालाच पाहिजे; विरोधकांचे आंदोलन
आंदोलन बेमुदत करण्याचा इशारा
मुख्यमंत्र्यांनी जोपर्यंत चर्चा करत नाही तोपर्यंत आझाद मैदानातून हलणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी चर्चा करावी. चर्चा न केल्यास एक दिवसाचे धरणे आंदोलन बेमुदत करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. नियमानुसार आझाद मैदानात रात्रीच्यावेळेत आंदोलकांना थांबता येत नाही. मात्र मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही तोपर्यंत मैदान सोडणार नसल्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
वाचा – जैतापूर, नाणार घातक प्रकल्प का नकोत
मुख्यमंत्री कार्यालयाकडून चर्चेसाठी टाळाटाळ
नाणार प्रकल्पाविषयी बोलण्याकरता मुख्यमंत्री कार्यालयाकडे चर्चेसाठी वेळ मागितली असता उद्योगमंत्र्यांसोबत चर्चा करण्यास सांगितले जाते. याउलट उद्योगमंत्र्यांनी याआधीच अध्यादेश रद्द करण्याची कागदपत्रे उच्च स्तरीय समितीकडे पाटवली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांशिवाय अन्य कोणताही मंत्री हा प्रश्न सोडवू शकत नाही हे माहित असताना देखील मुख्यमंत्री कार्यालयाकडून चर्चेसाठी टाळाटाळ होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.