घरमुंबईचक्रीवादळाचा तडाखा बसलेले कॉलेज निधीच्या प्रतीक्षेत - विद्यापीठाकडून दुर्लक्ष 

चक्रीवादळाचा तडाखा बसलेले कॉलेज निधीच्या प्रतीक्षेत – विद्यापीठाकडून दुर्लक्ष 

Subscribe

मुंबई विद्यापीठाशी संलग्न कॉलेजांना विद्यापीठ प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतरही आपत्कालीन निधीतून मदत मिळालेली नाही. त्यामुळे विद्यापीठाला आपत्कालीन निधीचा विसर पडला आहे.

कोकणातील निसर्ग चक्रीवादळाच्या तडाखा मोठ्या प्रमाणावर रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे १६ कॉलेजांचे अतोनात नुकसान झाले. मुंबई विद्यापीठाशी संलग्न कॉलेजांना विद्यापीठ प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतरही आपत्कालीन निधीतून मदत मिळालेली नाही. त्यामुळे विद्यापीठाला आपत्कालीन निधीचा विसर पडला असून, कॉलेजांना तातडीने मदत देण्यासह इतर पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोकण किनारपट्टीला ३ जूनला बसलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात नुकसान झालेल्या कॉलेजांच्या पाहणीसाठी मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य, विद्यापीठातील अधिकारी व प्राचार्‍यांनी एक विशेष दौरा केला. या दौर्‍यादरम्यान कॉलेजांमधील संगणक, खुर्ची, टेबलसह अनेक वस्तूंचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. दौर्‍यानंतर विद्यापीठाने शक्य ती मदत देण्याचे आश्वासन देत समिती गठित केली. परंतु अद्याप निधीबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. यातून समिती आणि विद्यापीठ प्रशासनाचा ढिसाळ कारभार दिसून येत असल्याची टीका तांबोळी यांनी केली.

- Advertisement -

निधी देण्यासाठी विद्यापीठ प्रशासन बैठकांचा खेळ करत असतानाच प्राचार्य आणि विविध संघटनांनी पुढाकार घेत संगणक, ग्रंथालयातील कपाट, प्रिंटर आदी वस्तू पुरवल्या आहेत. दुरुस्तीसाठी प्रचंड खर्च येणार असल्याने संस्थाचालकांचे लक्ष विद्यापीठाच्या मदतीकडे लागले आहे. विद्यापीठाच्या नियमानुसार नवीन कॉलेज, तुकडी सुरू करताना कॉलेजांना बँकांमध्ये ठेवी ठेवणे बंधनकारक आहे. आपत्कालीन परिस्थितीत हा निधी वापरल्यास त्याचा योग्य उपयोग होऊ शकतो. त्यामुळे या ठेवींचा वापर चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कॉलेजांसाठी करावा अशी मागणी तांबोळी यांनी कुलगुरूंना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणार्‍या निधीचे काय?

मुंबई विद्यापीठ १० वर्षांपासून विद्यार्थ्यांकडून आपत्कालीन निधीसाठी प्रति विद्यार्थी १० रुपये तर कुलगुरू निधीसाठी २० रुपये जमा करत आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न सुमारे ८०० कॉलेजात दरवर्षी शिक्षण घेणार्‍या सुमारे ७ लाख विद्यार्थ्यांकडून हा निधी घेण्यात येत आहे. कोट्यवधींच्या निधीचा संकट काळात वापर होत नसेल तर या निधीचा उपयोग काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -