मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाअधिवेशनात आपल्या नव्या झेंड्यांचे अनावरण करत मनसेची भुमिका स्पष्ट केल्यानंतर सामना अग्रलेखातून आज मनसेवर जोरदार टीका करण्यात आली. सामनामधून करण्यात आलेल्या टिकेला मनसेचे नेते देखील जशास तसे उत्तर देत आहेत. मात्र मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमय खोपकर यांनी तर घरात येणारा सामना पेपर बंद करण्याचा निर्णय घेतला असून, त्यांनी ट्वीटरवरून तशी माहिती दिली.
23 जानेवारी, १९८९ रोजी ‘सामना’ हे शिवसेनेचे मुखपत्र सुरु झाले. त्या दिवसापासून आजतागायत नियमित ‘सामना’ आमच्या घरी येत होता. पत्रकारांनी केलेली टीका आम्ही समजू शकतो, पण रडत राऊत जी आगपाखड आता करत आहेत त्याचा निषेध म्हणून आजपासून ‘सामना’ बंद बंद बंद-अमेय खोपकर
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) January 25, 2020
काय म्हणाले अमेय खोपकर –
“२३ जानेवारी १९८९ रोजी ‘सामना’ हे शिवसेनेचे मुखपत्र सुरु झाले. त्या दिवसापासून आजतागायत आमच्या घरी नियमित ‘सामना’ येत होता. आम्ही पत्रकारांनी केलेली टीका समजू शकतो, पण रडत राऊतजी आता आगपाखड करत आहेत. त्याचा निषेध म्हणून आजपासून ‘सामना’ बंद बंद बंद.” ज्यांनी गेल्या काही महिन्यात झेंडे आणि अजेंडे बदलले त्यांनी दुसऱ्याच्या झेंड्यावर बोलूच नये. आमचा महाराष्ट्र धर्म तितकाच कडवा आहे. तुमच्यासारखी दिल्लीश्वरांपुढे आम्ही निष्ठा गहाण टाकली नाही. भसाभसा अग्रलेख खरडले म्हणजे तुम्ही काही थोर होत नाही. महाखिचडीची सत्ता हातून गेली की ढसाढसा रडू नका म्हणजे झालं, असं म्हणत खोपकर यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली.
दरम्यान सामनाच्या अग्रलेखात “वीर सावरकर आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पेलणे हा काही येरागबाळ्याचां खेळ नाही. तरीही या देशात कुणी हिदुत्वाचा पुरस्कार करणारी नवी घडी बसवत असेल तर त्याचे स्वागत करण्याची दिलदारी आमच्याकडे आहेच. विचार ‘उसना’ असला तरी हिंदुत्त्वाचाच आहे”, अशा शब्दात शिवसेनेने मनसेवर टीका केली. त्यामुळे आता मनसेचे नेते देखील याला जशास तसे उत्तर देत आहे. सामनाच्या अग्रलेखानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. “आधुनिक अफझल खानानं हिंदुंच्या आणि मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं आहे. याच गोष्टीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बोट ठेवल्यानं त्यांना झालेली पोटदुखी ही अग्रलेखातून दिसत आहे,” अशी घणाघाती टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.
आधुनिक अफजल खानानी मराठी आणि हिंदूंच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. नेमकं त्याच गोष्टीवर राजसाहेबांनी बोट ठेवल्यामुळे झालेले जुलाब सामन्याच्या अग्रलेखातून बाहेर पडत्यात. काळजी करू नका आम्हीच उपचार करू.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 25, 2020