घरमुंबईआंदोलनकर्त्या शिक्षकांवर पोलिसांकडून लाठीमार

आंदोलनकर्त्या शिक्षकांवर पोलिसांकडून लाठीमार

Subscribe

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिक्षकांच्या अनुदानाच्या प्रश्नासह इतर मागण्यांसाठी शिक्षकांनी पुकारलेल्या आंदोलनाने सोमवारी हिंसक रूप धारण केले. मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करत असलेले हे शिक्षक आझाद मैदानातून मोर्चा घेऊन मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊ इच्छित होते.

मात्र पोलिसांनी त्यांना गेटवरच अडवले. तेव्हा शिक्षण आणि पोलिसांमध्ये झटापट होऊन पोलिसांनी आंदोलनकर्त्या शिक्षकांवर लाठीमार केला. त्यात अनेक शिक्षक जखमी झाले आहेत. दरम्यान, या लाठीमारानंतर शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी या शिक्षकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शिक्षकांचा प्रश्न सोडविला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

- Advertisement -

मुंबईसह राज्यातील अनेक शिक्षक संघटनांचे गेल्या १४ दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. १४ दिवस सुरु असलेल्या या आंदोलनानंतरही सरकारने त्यांच्या मागण्याविषयी ठोस आश्वासन न दिल्याने संघटनेकडून आक्रमक पवित्रा धारण केला. १०० टक्के अनुदाना शिवाय माघार घेणार नसल्याचा इशारा देत शिक्षकांनी वर्षा निवासस्थानावर आपला मोर्चा वळविला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखले असता शिक्षक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. तेव्हा पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत लाठीमार सुरु केल्याने या परिसरात तणाव पसरला. मागण्या मान्य झाल्याशिवाय येथून जायचे नाही.

मागण्या मान्य होतील नाहीतर आमचे मृतदेह येथून जातील असा निर्धार शिक्षकांनी केला. हळहळू आंदोलकांची संख्या वाढू लागल्याने वातावरण तापले. अचानक झालेल्या लाठीमारामुळे मोर्चेकर्‍यांची एकच धावपळ झाली. त्यात १० ते १५ शिक्षक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. आझाद मैदानात निर्माण झालेल्या या तणावाच्या परिस्थितीनंतर स्वत: पोलीस उपायुक्तांनी घटनास्थळी धाव घेऊन मोर्चेकर्‍यांना समजावण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलीस उपायुक्तांनी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्याशी त्वरित संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर मोर्चेकर्‍यांच्या पाचजणांच्या शिष्टमंडळाला शेलार यांनी भेटायला बोलावल्याचे पोलिसांनी मोर्चकर्‍यांना सांगितले. त्याला मोर्चेकर्‍यांनी सुरुवातीला विरोध केला. मंत्र्यांनाच आझाद मैदानात बोलवण्याची मागणी मोर्चेकर्‍यांनी लावून धरली. त्यानंतर अखेर पोलिसांच्या शिष्टाईमुळे पाचजणांचे शिष्टमंडळ शिक्षण मंत्र्यांना भेटायला गेले होते.

- Advertisement -

येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न तातडीने घेऊन त्यावर तोडगा काढण्यात यावा, तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन मागे घेणार नाही, असा इशाराही मोर्चेकर्‍यांनी दिला. तर या शिष्टमंडळाला आश्वासन देताना आशिष शेलार म्हणाले की,परवाची कॅबिनेट ही शेवटची कॅबिनेट नाही. अजून ३ ते ४ कॅबिनेट होणार आहेत. आचारसंहितेपूर्वी तुमच्या मनासारखा निर्णय घेतो. वेळ पडल्यास तुमच्यासाठी विशेष कॅबिनेट घेऊ. चिंता करु नये, असे आश्वासन शेलार यांनी शिक्षकांना दिले आहे. दरम्यान, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्या शिक्षकांनी दिला आहेत.

या मागण्यांसाठी आंदोलन
 मराठी व प्रादेशिक भाषेतील ज्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना १९ वर्षांपासून अनुदान सुरू केलेले नाही, त्यांचे अनुदान सुरू करावे.
 ज्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना २०% अनुदान सुरू केले, त्यांना नियमानुसार १००% अनुदान द्यावे.
 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश देऊन कर्तव्यात चालढकल केल्याप्रकरणी संबंधित अधिकार्‍यांना तत्काळ निलंबित करावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -