मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकीकडे राज्यातून कोरोनाचा निपटारा करण्यासाठी प्रयत्न करत असताना त्यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांना पितृशोक झाला आहे. त्यांचे वडिल आणि ज्येष्ठ उद्योजक माधवराव पाटणकर यांचं आज वृद्धपकाळाने निधन झालं आहे. ते ७८ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना अंधेरीच्या क्रिटीकेअर या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीक पाटणकर यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, परिवहनमंत्री अनिल परब, आमदार सदा सरवणकर, एटीएस प्रमुख देवेन भारती, महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे सचिव आशिष कुमार सिंग आदी उपस्थित होते. पाटणकर यांच्या मृत्यूनंतर राजकीय विश्वातून शोक व्यक्त करण्यात आला आहे.
माधवराव पाटणकर यांची ज्येष्ठ उद्योजक म्हणून ओळख होती. उद्योगविश्वात कार्यरत असतानाच त्यांनी सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात देखील आपला वावर ठेवला होता. या क्षेत्रांमधल्या अनेक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. नावाजलेल्या प्रबोधन प्रकाशनचे ते सन्माननीय विश्वस्त देखील होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे सासरे व रश्मी ठाकरे यांचे वडील माधव पाटणकर यांचे निधन झाले.त्यांच्या निधनामुळे पाटणकर व ठाकरे कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.भावपूर्ण श्रद्धांजली. @OfficeofUT
— Supriya Sule (@supriya_sule) June 15, 2020
माधवराव पाटणकर यांच्या निधनामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीने आपल्या सर्व नियोजित बैठका रद्द केल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राजकीय विश्वातल्या अनेक मान्यवरांनी पाटणकर यांना आदरांजली वाहिली. तसेच, ठाकरे कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे संदेश दिले. यांच्यासोबतच राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील माधवराव पाटणकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. ‘माधव पाटणकर यांचे निधन झाल्याचे समजून दु:ख झाले. पाटणकर आणि ठाकरे कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. ईश्वर दिवंगत श्री माधव पाटणकर यांच्या पवित्र आत्म्यास सद्गती देवो. तसेच, पितृवियोगाचे दु:ख सहन करण्याची शक्ती सौ. रश्मी तसेच त्यांच्या आप्तेष्टांना प्रदान करो, ही याप्रसंगी प्रार्थना करतो’, असं पत्र राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवलं आहे.