डोंबिवली -दिवा – वसई मार्गावरील पाच रेल्वे स्थानकावर नेहमीच मोठ्या प्रमाणावर जखमी दिसून येतात. मात्र अशा जखमींना वेळेवर रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी ना हमाल, ना रुग्णवाहिका यामुळे अशा प्रवाशांपर्यत पोलीस पोहचेपर्यंत ते जखमी तडफडून प्राण सोडतात. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना वारंवार कळवले जाते. पण आंधळ्या रेल्वे प्रशासनाला याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही.
जखमी प्रवाशांना नेण्यासाठी रुग्णवाहिका नाही
डोंबिवली रेल्वे स्थानकात ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत एकूण १५७ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर ९१ जण जखमी झाल्याचे सांगितले. डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत वसई जुचंद्र पर्यंतचा भाग असून या मार्गावर कोपर, भिवंडी, बापगाव, कामण आणि जुचंद्र अशा पाचही रेल्वे स्थानकावर रेल्वे अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना आणण्यासाठी हमाल नाहीत वा रुग्णवाहिकेची सेाय नाही. यामार्गावर मर्यादित ट्रेन धावत असल्याने रात्री अपरात्री एखादा अपघात झाला तर डोंबिवली रेल्वे पोलिसांना पायपीट करावी लागते. दिवसासुध्दा या मार्गावर तीन चारच ट्रेन असल्याने जखमी प्रवाशांना आणणे अत्यंत त्रासाचे असते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनेकदा जखमी प्रवाशांना योग्य उपचार मिळाले तर अनेकांचे प्राण वाचले असते. पण रेल्वेने या मार्गावर कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत. वरिष्ठांना कळऊनही ते दुर्लक्ष करतात अशी तक्रार रेल्वे पोलिसांनी केली.
असा करावा लागतो रेल्वे पोलिसांना सामना
एका पोलिसांने दिलेल्या माहितीनुसार, अपघातात जखमी किंवा मृत प्रवाशाला आणण्यासाठी इतर नागरिकांची मदत घेण्याचा प्रयत्न केला तर ते तयार होत नाहीत. त्या नागरिकांना विनवणी करुन बोलवावे लागते. अगदीच कोणी तयार झाले नाही तर नाका कामगार आणावे लागतात. परंतु ते ५०० रुपयांपेक्षा कमी पैसे घेण्यास तयार होत नाहीत. रेल्वे केवळ १०० रुपये यासाठी मंजूर करते या गोष्टीकडे त्यांनी लक्ष वेधले. दिवा – वसई मार्गावर जखमी किंवा मृत माणूस पोलिसांना आणण्यासाठी कर्मचाऱ्यांना खूपच त्रासाला तोंड द्यावे लागत असून वरिष्ठांना वारंवार या त्रुटीसंदर्भात कळविण्यात आले आहे. पत्रव्यवहार करण्यात आला आहे. जखमी वा मृत प्रवाशांना आणणे आमच्या कर्मचाऱ्यांना खूपच त्रासाचे होत आहे अशी माहिती लोहमार्ग पोलीस ठाणे, डोंबिवलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी दिली.
हेही वाचा –