भाईंदर : वाहतूक पोलिसांनी कर्कश आवाज करत शहरात फिरणार्या दुचाकीवर सुरू केलेली कारवाई बंद झाल्याने मध्यंतरी बाईक चालकांचा सुळसुळाट झाला होता.मात्र पुन्हा एकदा आता रस्त्याने कर्कश आवाज करत फिरणार्या दुचाकी स्वरांवर कारवाई करण्यास काशिमिरा वाहतूक पोलिसांनी सुरुवात केली आहे. बुधवारी सायंकाळपासून वाहतूक शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक मंगेश कड यांनी व वाहतूक पोलिसांनी सायलेन्सरचा आवाज करत फिरणार्या दुचाकीस्वारांचा पाठलाग करत त्यांची धरपकड करत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. काशीमीरा वाहतूक पोलिसांकडून कर्ण कर्कश आवाज करणार्या दुचाकी चालकांवर मोटार कायद्याच्या कलम २३ (४) (ड ) व १७७ आणि ११९ (२) मोटर वाहन कायद्या अंतर्गत कारवाई करत १२०० रुपये दंड आकारला जात आहे. ज्या परिसरात बेशिस्त वाहन चालकांचे प्रमाण जास्त आहे, अशा ठिकाणी नाकाबंदी व गस्त चालू करण्यात येणार आहे.
शहरात अनेक तरुण हे आपल्या दुचाकी वाहनांचे सायलेन्सर फाडून किंवा दुचाकीला कर्ण कर्कश आवाज येईल असे सायलेन्सर, वेगवेगळ्या जोरदार आवाजाचे हॉर्न वाहनांना बसवून रस्त्याने आवाज करत गाडी चालवत असतात. यामुळे रस्त्यावरून चालणारे वयोवृद्ध नागरिक, महिला, लहान मुले यांचे कर्कश आवाज करणार्या वाहनांकडे लक्ष जाते व रस्त्याने जाणार्या वाहनांकडे लक्ष राहत नाही त्यामुळे अनेक वेळेस अपघात होतात. याच करता शहरातील बेशिस्त दुचाकीस्वरावर लगाम लावण्यासाठी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी कर्ण कर्कश आवाज करणार्या दुचाकीवर कारवाई करण्यास सुरुवात पुन्हा सुरवात केली आहे.