विक्रमगड: विक्रमगड तालुक्याची तहान भागवण्यासाठी जलजीवन मिशन योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील ५० गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. विक्रमगड तालुक्याची लोकसंख्या 1 लाख १४ हजार असून पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसागणिक तीव्र होत आहे. तालुक्यातील ३९ स्वतंत्र ग्रामपंचायती आणि ग्रामदान मंडळ असलेल्या गावांना स्ेवतंत्र नळपाणी पुरवठा योजना आहे. पण, त्यात सावळागोंधळ असल्याने पाणीपुरवठा योजनांचा बोजवारा उडून पाणी समस्या कायम आहे.
विक्रमगड तालुक्यातील ५० गावांना पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या आहेत. यामध्ये केगवा, कासाबु, उपराळे, आंबेघर तर्फे धरमपूर, बांगरचोळे, बोरांडे शीळ ,चापके-तलावली, दादडे, देवपूर, इंदगांव, कर्हे, कशिवली, कावळे, कवडास, कोंडगांव, म्हसरोली, मोहोबु, नागझरी, सजन, झडपोली, सावरोली, सावराई, शेलपाडा, शिळ, तलवाडा, वेढेबु, विळशेत, विठठलनगर, भोपोली, वेहेलपाडा, सवादे, सातकोर, माडाचापाडा, कुंज, देहेर्जे, चाराणवाडी, सारशी, डोल्हारी खुर्द, घाणेघर, कुंर्झे, शिळशेत, वडपोली, मेढी, वसुरी, चंद्रनगर, खांडेघर, खांड, बालापुर, खडकी, हातणे, अनंतपुर, चिंचघर, ब्राम्हणगाव, बास्ते, आपटी अशा जवळजवळ अर्धा तालुक्यातील गावांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आल्याने आता या गावाची पाणी समस्या मिटणार आहे.
ग्रामस्थांना या योंजनेचे अंतर्गत घरपोच नळाने शुध्द पिण्याचे पाणी मिळणार आहे. दरवर्षी फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच या गावांना पाणी टंचाई सामना करावा लागत असतो. यावर मात करण्यासाठी जलजीवन मिशन योजने अंतर्गत बारमाही पाणी देण्याचे नियोजन तयार करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांमध्ये योजना सुरु होणार आहे. जलजीवन मिशन अंतर्गत प्रतिव्यक्तीला ५५ लिटर पाणी मिळावे, यासाठी नियोजन केले आहे. बारमाही महिने ग्रामस्थांना मुबलक पाणी मिळण्यासाठी हे नियोजन असणार आहे. योजनेमुळे येथील ग्रामस्थांची पाणीटंचाईतून मुक्त होणार आहे.
या पाणीपुरवठा योजनांमुळे अनेक गाव पाड्या,वस्त्यांवर पिण्याची पाण्याच्या व्यवस्था होणार आहे. तालुक्यामध्ये ८१ गावासाठी योजना प्रस्तावित केली आहे. त्यापैकी ५९ गावांना ही योजना मंजूर झाली आहे. त्यापैकी १० टक्के गावातील योजनेच्या कामांना सुरुवात झाली आहे. भविष्याचा विचार करुन ही उपाय योजना करण्यात आली आहे. प्रत्येक गावात नळ जोडणीसह वाढीव जलकुंभ देखील उभारले जाणार आहे. त्यामुळे भविष्यात विक्रमगड हा तालुका टँकरमुक्त होईल. मात्र, ज्या ठेकेदारांनी हे काम हाती घेतले आहे.त्यांनी शासनाच्या नियोजीत इस्टीमेंटप्रमाणे ही कामे वेळेत व चांगल्या दर्जाची लवकरात लवकर कशी पूर्ण होतील व याचा लाभ गावातील लाभार्थ्यांना मिळेल याकडे पाणीपुरवठा विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.