मुरुड: तालुक्यातील काही रस्ते अरुंद असल्यामुळे नवीन गाड्या मंजुर असूनही एसटी डेपोत येऊ शकल्या नाहीत.नवीन गाड्या जुन्या गाड्यांपेक्षा दोन मिटरने लांबीने जास्त असल्याने चालकांना या अरुंद रस्त्यावरुन गाडी चालवणे धोक्याचे होऊ शकतो. त्यामुळे नवीन गाड्या प्रवाशांना मिळण्याची आशा मावळल्यात जमा असून त्यांना जुन्या गाड्यांमधूनच प्रवास करावा लागणार आहे, हे स्पष्ट आहे. दरम्यान, सदर प्रश्नी लोकप्रतिनिधींनी लक्ष देत मुरुड-नादगांव आणि मुरूड-बाजारपेठ येथील अरुंद रस्ता संदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याशी चर्चा करून पर्याय रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी प्रवाशी आणि मुरुडवासी करीत आहेत.
मुरुड जंजिरा पर्यटन स्थळ असल्याने देश -विदेशातून पर्यटक ये-जा करीत असून त्यांच्यासाठी एसटी गाड्या हेच परिवहनचे महत्वाचे साधन आहे. सध्या मुरुड आगारात ३८ गाड्या असुन त्यापैकी १३ निमआराम तर २५ साध्या आहेत.यापैकी १३निमआराम आणि १० साध्या गाड्यांचा कालावधी संपत आहे. १५ गाड्या घेऊन आगार चालविणे ही बाब प्रवाशांसाठी त्रासदायी ठरणार आहे. आगारासाठी नवीन गाड्या मंजुर झाल्या आहेत, मात्र त्यांची लांबी अधिख झाल्याने त्या पूर्वीच्या जुन्या मार्गांवरुन तसेच आधीच अरुंद असणार्या रस्त्यांवरुन धावू शकत नसल्याने या गाड्या आगारात आणल्या नसल्याची माहिती एसटी आगाराकडून देण्यात आाली.
काही ठिकाणी अपघात
मुरुड आगार व्यवस्थापक -सुनील वाकचौरे यांच्या शी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की
अरुंद रस्त्यामुळे नवीन गाड्या आगारात येवू शकल्या नाहीत.सध्या चालत असलेल्या काही गाड्यांचा कालावधीही लवकरच संपत असल्याने एसटी महामंडळाने आगाराकरीता १३नव्या गाड्या मंजूर केल्या आहेत.परंतु मुरुड येथील अरुंद रस्त्यामुळे त्या आगारात पोहचू शकल्या नाहीत. या आधीही शिवशाही गाडी चालवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ती गाडीही वळण घेताना काही ठिकाणी छोटे अपघात झाले आहेत.यामुळे चालकांना यांचा आर्थिक नुकसान झाले आहे, त्याचबरोबर गाडीचा नुकसान होत गेला. त्यामुळे शिवशाही गाडी बंद करावी लागली आहे.जोपर्यंत पर्यायी रस्ता मिळत नाही तो पर्यंत नविन गाड्या मुरुड आगारात येऊ शकत नाही, अशी माहिती आगार व्यवस्थापक सुनील वाकचौरे यांनी दिली.