भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर हे आपले मत मांडायला कधीही घाबरत नाहीत. आता भारताने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर त्यांनी कोहलीच्या नेतृत्वाबद्दल प्रश्न उभे केले आहेत. याबाबत इंडिया टुडेशी बोलताना ते म्हणाले,” धोनीकडून जेव्हा कोहलीला कर्णधारपद मिळाले तेव्हा सगळ्यांना वाटलेले की तो काहीतरी वेगळे करेल. कारण, धोनी शांत कर्णधार होता तर कोहली त्याच्या अगदी विरुद्ध आहे.”
खऱ्या कसोटीत कोहली झाला फेल
” कोहली कर्णधार बनल्यानंतर भारताने भारतात चांगले प्रदर्शन केले. त्यामुळे भारताने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानही पटकावले. पण भारताची खरी कसोटी ही द.आफ्रिका आणि इंग्लंडमध्येच होती. या दोन्ही देशांत भारताने मालिका गमावल्या. त्यामुळे कोहलीच्या नेतृत्वाबद्दल अजूनही प्रश्नचिन्ह आहेत.”
एकटा कोहली किती धावा करेल ?
” परदेशात भारताचे फलंदाज अपयशी ठरत आहेत. कोहली वगळता एकाही फलंदाजाला सातत्यपूर्ण प्रदर्शन करता आलेले नाही. त्यातच भारत फक्त ५ फलंदाजांनी खेळत असल्याने कोहलीवर रन करायचा जास्त दबाव असतो. पण तो प्रत्येक सामन्यात चांगली बॅटिंग करतो. पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळत नाही.”