न्यूझीलंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिले तीन सामने जिंकत भारताने ही मालिका जिंकली असल्याने चौथ्या आणि पाचव्या सामन्यात युवा फलंदाज शुभमन गिलला संधी मिळण्याची शक्यता आहे. गिल हा भारताने जिंकलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता. त्यालाच या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला होता. तर त्याने यंदाच्या रणजी चषकातही दमदार कामगिरी केली. त्यामुळे आता त्याला आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळवले पाहिजे असे मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केले.
शुभमन गिलला न्यूझीलंड दौर्यासाठी संघात स्थान मिळणे योग्यच होते. आता त्याला अखेरच्या दोन सामन्यांत खेळण्याची संधी दिली पाहिजे. तो या सामन्यांत चांगली कामगिरी करू शकेल. जर तो चांगला खेळला तर भारताला इंग्लंडमध्ये होणार्या विश्वचषकासाठी अजून एक चांगला फलंदाज मिळेल. कर्णधार विराट कोहलीनेही त्याचे कौतुक केले आहे. कर्णधाराकडून कौतुक झाले म्हणजे नक्कीच गिलमध्ये काहीतरी खास असेल, असे गांगुली म्हणाला.
गांगुलीप्रमाणेच महान फलंदाज सुनील गावस्करसुद्धा भारताने उर्वरित सामन्यांत गिलला संधी दिली पाहिजे असे म्हणाले. भारताने गिलला संधी दिली पाहिजे. त्याला जर फलंदाजीची संधी मिळाली तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळू शकेल की नाही याचा भारतीय संघ व्यस्थापनाला अंदाज येईल. मात्र, मी त्याला कोहलीच्या जागी म्हणजे तिसर्या क्रमांकावर नाही तर चौथ्या क्रमांकावर खेळवीन आणि रायडूला तिसर्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवीन, असे गावस्कर म्हणाले.