आयपीएल २०२२ च्या १५ व्या हंगामात आरसीबीचा विकेट किपर दिनेश कार्तिक सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध झालेल्या सामन्यात दिशेन कार्तिकने उत्कृष्ट फलंदाजी करत अर्धशतक झळकावलं आहे. कार्तिकच्या या खेळीमुळे आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा १६ धावांनी पराभव केला. संघाला जिंकवून देण्यासाठी दिनेश कार्तिकसह शाहबाजने सुद्धा त्याला उत्तम साथ दिली. यामध्ये शाहबाजने ३२ धावा पूर्ण केल्या. मात्र, मी मोठं लक्ष्य निश्चित केलंय, अशी प्रतिक्रिया दिनेश कार्तिकने दिल्ली विरूद्धच्या सामन्यानंतर दिली आहे.
काय म्हणाला दिेनेश कार्तिक?
मी मोठं लक्ष्य निश्चित केलंय. ते साध्य करण्यासाठी कठोर मेहनत घेत आहे. देशासाठी काहीतरी मोठं करण्याचं माझं लक्ष्य आहे. हे सर्व त्या प्रवासाचा भाग आहे. मला टीम इंडियात पुन्हा जागा मिळवायची आहे. त्यासाठी मी सर्वस्व पणाला लावण्यास तयार आहे, अशी प्रतिक्रिया दिनेश कार्तिकने दिली आहे.
यंदाच्या हंगामात कार्तिक आरसीबीमधून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. ६ सामन्यातील सहा इनिंगमध्ये १९२ ची सरासरी आणि २०८.६९ च्या स्ट्राईक रेटने १९२ धावा केले आहेत. यामध्ये अर्धशतकाचा सुद्धा समावेश आहे. परंतु ६ इनिंगमध्ये कार्तिक पाच वेळा नाबाद राहिला आहे.
आरसीबीने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ५ गडी गमावून १८९ धावा केल्या. यादरम्यान कार्तिकने ३४ चेंडूंचा सामना करत ५ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ६६ धावा करत नाबाद राहिला. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ १७३ धावांवर गारद झाला. दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक ६६ धावा केल्या.
गेल्या काही वर्षांमध्ये टीम इंडियाने विकेट किपर म्हणून ऋषभ आणि इशान किशन यांना संधी दिली आहे. मात्र, या दोघांसाठी यंदाच्या आयपीएलचा हंगाम खास ठरलेला नाहीये.
डु प्लेसिसने केले कार्तिकचे कौतुक
सुरुवातीला फलंदाजी करणे अवघड होते, पण मॅक्सवेलने ज्या प्रकारे दबाव आणला तो महत्त्वाचा होता. पण १९० पर्यंत पोहोचण्यासाठी एका खास डावाची गरज होती आणि याचे श्रेय शाहबाज आणि दिनेश कार्तिक या दोन खेळाडूंना जाते, असं डु प्लेसिस म्हणाला.