भारतीय संघाकडे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी असून बुधवारपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत भारताचे आघाडी दुप्पट करण्याचे लक्ष्य आहे. नॉटिंगहॅम येथे झालेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. दुसऱ्या कसोटीत मात्र भारतीय संघाने उत्कृष्ट खेळ करत १५१ धावांनी विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी भेदक मारा केला आहे. तसेच फलंदाजीत लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तर दुसरीकडे कर्णधार जो रूट वगळता इंग्लंडच्या खेळाडूंनी निराशा केली आहे. त्यामुळे उर्वरित मालिकेत भारतीय संघाचे पारडे जड आहे. मात्र, इंग्लंडला कमी लेखण्याची चूक करू नका, अशी ताकीद भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी भारतीय संघाला दिली आहे.
भारताने मालिका जिंकली पाहिजे
इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची भारताला ही सर्वोत्तम संधी आहे. भारतीय संघ सध्या मालिकेत १-० असा आघाडीवर आहे आणि त्यांनी दोन्ही कसोटीत उत्कृष्ट खेळ केला आहे. त्यामुळे त्यांचे पारडे जड आहे. त्यांनी ही मालिका जिंकली पाहिजे. परंतु, भारतीय संघाने इंग्लंडला कमी लेखण्याची चूक करू नये. भारताच्या फलंदाजांनी, विशेषतः मधल्या फळीतील फलंदाजांनी आणखी धावा करणे गरजेचे आहे, असे वेंगसरकर म्हणाले.
रूटला लवकर बाद करावे लागेल
इंग्लंडचा कर्णधार जो रूटने या मालिकेत दमदार कामगिरी केली आहे. पहिल्या दोन कसोटीत दोन शतकांच्या मदतीने त्याने ३८६ धावा फटकावल्या आहेत. त्यामुळे भारताला तिसरी कसोटी जिंकण्यासाठी रूटला लवकर बाद करावे लागणार असल्याचे इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पनेसारला वाटते. हेडिंग्लेवर तिसरा कसोटी सामना होणार आहे आणि हे रूट व जॉनी बेअरस्टोचे घरचे मैदान आहे. भारताने लॉर्ड्सवर उत्कृष्ट खेळ केला. हेडिंग्ले कसोटीत भारताचे पारडे जड आहे. परंतु, त्यांना रूटला लवकर बाद करावे लागेल, असे पनेसार म्हणाला.
हेही वाचा – विराट शतकाचा दुष्काळ लवकरच संपवेल; प्रशिक्षकांना विश्वास