कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी साजरा होणारा दहीहंडी उत्सव (Dahi handi) गेल्या वर्षी रद्द करण्यात आला. दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिल्याने याही वर्षी दहीहंडी उत्सवाला परवानगी नाकारण्यात आली आहे. यावरुन राजकारण तापलं असून भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी थेट राज्य सरकारला आव्हान दिलं आहे. सरकारनं कुठलाही फतवा काढला तरी घाटकोपरमध्ये दहीहंडी साजरी होणार असं राम कदम यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींसोबत आज बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईसहीत महाराष्ट्रामध्ये दहीहंडी आयोजित करण्याला राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. यानंतर राम कदम यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली. आयोजक या नात्याने घाटकोपर येथे दहीहंडी उत्सव साजरा होणार. सरकारनं आम्हाला कितीही रोखलं तरी साजरा होणार, असं राम कदम म्हणाले.
“आम्हाला नियमांबद्दल काहीच म्हणायचं नाही. आम्ही नियम पाळायला तयार आहोत. मात्र प्रत्येकवेळी संयमाची सबुरीची भाषा हिंदू बांधवांनाच का सांगायची? दहीहंडी उत्सवाच्या आयोजकांपैकी अनेकजण हे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. त्यांचीही फसवणूक सरकारने केली आहे,” असं राम कदम म्हणाले.
#दहीहंडी होणारच.. घरात बसुन सबुरीचे आम्हाला नकोत.. #बार उघडता त्यांना नियम लावता आणी हिन्दू सणांना विरोध ? आम्ही दहीहंडी करणारच .. pic.twitter.com/x1YB2512p3
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) August 23, 2021
“बियर बार, दारुचे ठेले सुरु करता. त्यांच्यासाठी नियम बनवता. तसे नियम बनवणार असाल तर त्या नियमांचं स्वागत करु, नियमांचं पालन करु. पण तुम्ही नियम बनवणार नसाल आणि एअर कंडिशन बंगल्यामधून सांगणार असाल की दहीहंडी साजरी करायची नाही तर हिंदू बांधव ऐकणार नाहीत. आम्ही दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणारच,” असं राम कदम म्हणाले.
हेही वाचा – यंदाही कोरोनामुळे दहीहंडीचे थर लागणार नाहीत