भारताचा कर्णधार विराट कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. परंतु, विराटला मागील काही काळात धावांसाठी झुंजावे लागले आहे. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ७० शतके केली आहेत, पण त्याने अखेरचे शतक हे जवळपास दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबर २०१९ मध्ये केले होते. इंग्लंडविरुद्ध सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांत मिळून त्याला केवळ ६२ धावा करता आल्या आहेत. याऊलट इंग्लंडचा कर्णधार जो रूटने या दोन कसोटीत सर्वाधिक ३८६ धावा फटकावल्या आहेत. मात्र, विराटला लवकरच सूर गवसेल आणि तो शतकाचा दुष्काळ संपवेल, असा त्याचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांना विश्वास आहे.
धावा होत नसल्याची चिंता नाही
विराटला काहीही सांगण्याची गरज नाही. तो जिद्दी आहे. चांगली कामगिरी करण्यासाठी तो स्वतःवर दडपण टाकतो. दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर मी विराटसोबत चर्चा केली होती. भारतीय संघाने सामना जिंकल्याचा त्याला आनंद होता. त्याला धावा होत नसल्याची अजिबातच चिंता नाही. त्याच्या या सकारात्मक दृष्टिकोनामुळेच तो लवकरच शतकाचा दुष्काळ संपवेल असा मला विश्वास असल्याचे शर्मा यांनी सांगितले.
दमदार कामगिरी करेल असा विश्वास
विराटला धावांसाठी झुंजावे लागत असतानाच रूट दमदार कामगिरी करत आहेत. त्यामुळे विराटवर अधिक दडपण असल्याचे वाटते का? असे विचारले असता शर्मा म्हणाले, रूटचा पाठलाग करणे आणि त्याच्याइतकीच चांगली कामगिरी करणे हे विराटसमोरील आव्हान आहे. मी विराटला अगदी लहानपणापासून ओळखतो. त्यामुळे त्याला आव्हानांवर मात करायला खूप आवडते, हे मी खात्रीने सांगू शकतो. पुढील सामन्यांत तो दमदार कामगिरी करेल असा मला विश्वास आहे.
हेही वाचा – IND vs ENG 3rd Test : कोहली, राहुलची नेट्समध्ये जोरदार बॅटिंग