विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने मागील काही वर्षांत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मात्र, असे असले तरी कोहलीच्या नेतृत्वात भारताला कोणतीही मोठी स्पर्धा जिंकता आलेली नाही. महेंद्रसिंग धोनी कर्णधार असताना भारताने २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली होती. त्यानंतरच्या ७ वर्षांमध्ये आयसीसीच्या जागतिक स्पर्धांमध्ये भारताची जेतेपदाची पाटी कोरी आहे. २०१९ एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये भारतीय संघात कर्णधार कोहली, धोनी, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्यासारख्या अप्रतिम खेळाडूंचा समावेश होता. परंतु, उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ पराभूत झाला. भारतीय संघाच्या या अपयशाला जास्त दडपण घेणे हे कारण असू शकेल असे भारताचा माजी यष्टीरक्षक दीप दासगुप्ताला वाटते.
सामन्यांचा खूप विचार करतात
आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारताला २०१३ पासून बाद फेरीतील एकही सामना जिंकता आलेला नाही. यामागे नक्की काय कारण आहे, हे सांगणे तसे अवघड आहे. परंतु, माझ्या मते, आयसीसीच्या जागतिक स्पर्धांमधील महत्वाच्या सामन्यांचे भारतीय खेळाडू जरा जास्त दडपण घेतात किंवा या सामन्यांचा खूप विचार करतात, असे दीप म्हणाला.
प्रत्येक सामना जिंकण्याची संधी होती
२०१९ वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडविरुद्धचा उपांत्य फेरीतील सामना भारताने जिंकला पाहिजे होता. २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताला एक नो-बॉल महागात पडला. मी याबाबत जास्त बोलणार नाही. तसेच २०१६ टी-२० वर्ल्डकपमध्ये वानखेडे येथे झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात नाणेफेकीची महत्वाची भूमिका होती. भारताने प्रथम फलंदाजी करताना चांगली धावसंख्या उभारली होती, पण त्यांना ती रोखणे अवघड गेले. एकूणच भारताला प्रत्येक सामना जिंकण्याची संधी होती, असेही दीपने सांगितले.