आयपीएल २०२२ च्या ३० व्या सामन्यात राजस्थानने कोलकात्याचा ७ धावांनी पराभव करत रोमांचक विजयाची नोंद केली. केकेआरसमोर २१८ धावांचे लक्ष्य होते, प्रत्युत्तरात केकेआर केवळ २१० धावाच करू शकला. केकेआरच्या पराभवाला प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम हे सर्वात मोठे जबाबदार होते. मॅक्युलमने सामन्यात असे काही निर्णय घेतले जे कोणालाच कळाले नाहीत.
राजस्थानने दिलेल्या २१८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताच्या संघाचा सलामीवीर व्यंकटेश अय्यरला मॅक्कुलमने सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले. हा निर्णय सर्वांच्याच आकलनापलीकडचा होता. त्याचवेळी पॅट कमिन्सचा आधी शिवम मावीही फलंदाजीला आला. कमिन्सने ९ व्या क्रमांकावर फलंदाजी केली.
यावरून संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि प्रशिक्षक मॅक्युलम यांच्यात बाचाबाचीही झाली. अय्यर पॅव्हेलियनमध्ये जात असताना तो मॅक्युलमशी रागाने बोलताना दिसला. इरफान पठाण, पियुष चावला आणि आकाश चोप्रा यांनीही यावरुनच दोघांमध्ये बाचाबाची सुरू असल्याचे म्हटले.
या सामन्यात समालोचन करणाऱ्या पियुष चावलानेही प्रश्न उपस्थि केले. शिवम मावी देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगली फलंदाजी करू शकत नाही. अशा स्थितीत कमिन्सच्या आधी त्याला फलंदाजीला पाठवणे पूर्णपणे चुकीचे होते. यंदाच्या हंगामातील आपल्या पहिल्या सामन्यात कमिन्सने मुंबईविरुद्ध १५ चेंडूत ५६ धावा केल्या होत्या. तर कमिन्स आणि मावी या दोघांनाही राजस्थानविरुद्ध खातेही उघडता आले नाही.
सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या व्यंकटेश अय्यरच्या बॅटमधून ७ चेंडूत केवळ ६ धावा झाल्या. कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर ५१ चेंडूत ८५ धावा करून बाद झाला. अय्यरने सामना जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण त्याला साथ देणारा एकही फलंदाज नव्हता आणि शेवटी त्याला विकेटही गमवावी लागली.
— Diving Slip (@SlipDiving) April 18, 2022