कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, यंदा आयपीएल स्पर्धा होण्याबाबत साशंकता होती. मात्र, आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरुवात झाली. खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफचे इतर सदस्य यांना कोरोनाचा धोका उद्भवू नये यासाठी त्यांना जैव-सुरक्षित वातावरणात ठेवण्यात आले आहे. त्यांना ते सोडून जाण्याची परवानगी नाही. तसेच त्यांच्यासाठी आणखीही काही नियम बनवण्यात आले आहेत. हे नियम मोडल्यास खेळाडू आणि संघांना त्याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे.
स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवणार
बीसीसीआयने आयपीएलच्या आठही संघांना सक्त ताकीद दिली असल्याची माहिती आहे. जे खेळाडू परवानगी न घेता जैव-सुरक्षित वातावरणातून बाहेर पडतील, त्यांना सहा दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. दुसऱ्यांदा नियम मोडल्यास खेळाडूवर एका सामन्याची बंदी घालण्यात येईल. तर तिसऱ्यांदा ही चूक घडल्यास त्या खेळाडूला थेट स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे. त्याच्या जागी बदली खेळाडू घेण्याची परवानगी नसेल. तसेच जे खेळाडू दर दिवशी आरोग्य तपासणी करून घेणार नाहीत, जीपीएस ट्रॅकर घालणार नाहीत आणि कोरोना चाचणीसाठी हजर राहणार नाहीत, त्यांना ६० हजार रुपये दंड म्हणून भरावे लागणार आहेत.
संघाला १ कोटी रुपयांचा दंड
हेच नियम खेळाडूंचे कुटुंबिय आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांना लागू पडणार आहेत. प्रत्येक खेळाडू आणिसपोर्ट स्टाफ सदस्यांची दर पाचव्या दिवशी कोरोना चाचणी केली जाते. त्याचप्रमाणे ज्या संघाचे खेळाडू हे नियम मोडतील, त्या संघाला १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार असून त्यांचे २ गुणही कमी करण्यात येतील.