भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा टी-२० सामना मंगळवारी खेळला जाणार आहे. इंग्लंडने पहिला टी-२० सामना जिंकल्यानंतर भारताने दमदार पुनरागमन केले. भारतीय संघाने दुसरा टी-२० सामना ७ विकेट राखून जिंकत पाच सामन्यांच्या या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. त्यामुळे तिसरा टी-२० सामना जिंकत मालिकेत आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न आहे. भारतीय संघाने पहिल्या दोन सामन्यांसाठी अनुभवी सलामीवीर आणि उपकर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला होता. ‘आम्ही एक-दोन सामन्यांसाठी रोहितला विश्रांती देत आहोत,’ असे कर्णधार विराट कोहली पहिल्या सामन्याच्या वेळी म्हणाला होता. परंतु, तिसऱ्या सामन्यात रोहितचे संघात पुनरागमन होण्याची शक्यता असून लोकेश राहुलला संघातून वगळण्यात येऊ शकेल.
ईशान किशन संघातील स्थान राखणार
राहुलला पहिल्या दोन टी-२० सामन्यांत चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. पहिल्या सामन्यात तो केवळ एक धाव करू शकला, तर दुसऱ्या सामन्यात त्याला खातेही उघडता आले नाही. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात त्याच्या जागी रोहितचे भारतीय संघात पुनरागमन होऊ शकेल. दुसऱ्या टी-२० सामन्यात युवा डावखुरा सलामीवीर ईशान किशनला पदार्पणाची संधी मिळाली होती. त्याने या संधीचे सोने करताना ५६ धावांची खेळी करत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. त्यामुळे तो तिसऱ्या सामन्यात आपले संघातील स्थान राखणार हे जवळपास निश्चित आहे.
…तर रोहितचे पुनरागमन लांबणीवर
रोहित आता मुंबई इंडियन्स संघातील त्याचा सहकारी ईशानसोबत भारताच्या डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे. मात्र, राहुलने मागील काही काळात टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यामुळे केवळ दोन सामन्यांतील अपयशानंतर त्याला संघातून वगळणे भारताला अवघड जाऊ शकेल. परंतु, त्याला संघात कायम ठेवण्यात आले तर रोहितचे टी-२० संघातील पुनरागमन लांबणीवर पडू शकेल.