विजय हजारे ट्रॉफीमध्ये वारंवार युवा खेळाडूंचे शानदार प्रदर्शन पहायला मिळत आहे. ऋतुराज गायकवाड नंतर आता युवा स्टार खेळाडू व्यंकटेश अय्यरनेही शानदार खेळी करून सर्वांना आकर्षित केले आहे. रविवारी झालेल्या मध्यप्रदेश विरूध्द चंदीगडच्या सामन्यात व्यंकटेश अय्यरने आपल्या संघासाठी १५१ धावांची धमाकेदार खेळी केली. अय्यरने त्याच्या खेळीतील ११३ व्या चेंडूवर १५१ धावांच्या आकड्यापर्यंत मजल मारली. त्याने त्याच्या खेळीत ८ चौकार आणि १० षटकार लगावले. व्यंकटेश अय्यरने १३३ च्या स्ट्राइक रेटनुसार शानदार खेळी केली. दरम्यान या सामन्यात मध्यप्रदेशच्या संघाने ५० षटकांत ३३१ धावांची मोठी धावसंख्या उभारली. प्रथम फलंदाजी करत असलेल्या मध्यप्रदेशच्या संघाला चांगली सुरूवात मिळत होती.
मात्र, जेव्हा ५६ धावांवर ४ गडी बाद झाले होते तेव्हा कर्णधार आदित्य श्रीवास्तव आणि व्यंकटेश अय्यरने संघाचा डाव सावरला आणि एक महत्त्वपूर्ण भागीदारी करून संघाला एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवले. मात्र यानंतर अय्यरने आक्रमक खेळी करायला सुरूवात केली, अय्यरने फक्त षटकार आणि चौकारांच्या मदतीने ९२ धावा केल्या. या डावात १५१ धावा करण्यापूर्वी अय्यरने उत्तराखंडविरूध्दच्या सामन्यात शानदार ७१ धावांची खेळी केली होती. सोबतच दोन बळी देखील पटकावले होते. तर त्यामागील सामन्यात त्याने केरळविरूध्द शतक झळकावले होते.
1⃣0⃣0⃣ up & going strong! 💪 💪@ivenkyiyer2512 continues his superb run of form. 👏 👏 #MPvUTCA #VijayHazareTrophy pic.twitter.com/iiow2ATC2n
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 12, 2021
ऋतुराज गायकवाडची शतकीय खेळी
महाराष्ट्र आणि केरळ यांच्यात शनिवारी राजकोट येथे झालेल्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने ११० चेंडूत शतक पूर्ण केले. त्याने १२९ चेंडूत १२४ धावा केल्या. ज्यामध्ये ९ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. त्यापूर्वीच्या सामन्यात त्याने मध्य प्रदेशविरुद्ध ११२ चेंडूत १३६ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये त्याने १४ चौकार आणि ४ षटकार मारले होते. त्यानंतरच्या दुसऱ्या सामन्यात छत्तीसगडविरुद्ध नाबाद १५४ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याने १४३ चेंडूंचा सामना करत १४ चौकार आणि ५ षटकार लगावले होते.