स्वस्तात मिळणार्या घरांमुळे आणि दिवा हे जंक्शन असल्याने नागरिकांची पसंती दिवाला मिळत आहे.दिवाचे झपाट्याने नागरीकरण होत, लोकसंख्या वाढत आहे. मध्य रेल्वे मार्गावरील दिवा हे मुख्य स्थानक ठरत आहे. विशेष म्हणजे दिवा स्थानकातूनच दिवा-वसई, दिवा -पनवेल या गाडीसुध्दा जातात त्यामुळे प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. पूर्वी दिवा स्थानकात इतकी गर्दी नव्हती. ओसाड स्थानक म्हणूनच ओळखले जायचे. त्यामुळे भिकारी व गदुल्ल्यांचा वावर असायचा. मात्र आठ-दहा वर्षात दिवाची ओळख बदलत चालली आहे. प्रवाशांची संख्याही खूप वाढली दिवा स्थानकात लोकलमधील गर्दी कमी होते व भरतेही. दिवा रेल्वे स्थानकात पादचारी पूल असतानाही पुलाचा वापर फक्त पाच ते सात प्रवासी करतात.
बहुतांशी प्रवासी आपला जीव धोक्यात घालून रेल्वे क्रॉसिंग करीत असतात. एखादी लोकल आल्यानंतर जणू लोंढाच्या लोंढा रेल्वे रुळ ओलांडताना दिसतो. त्यातील बहुसंख्य प्रवासी कानात इअर फोन लावून असतात. त्यामुळे दिवा क्रॉसिंग अपघाताचे ठिकाण बनले आहे. २०१७ या वर्षभरात येथे ४० अपघातांची नोंद असून, त्यामध्ये २२ जणांचा मृत झाला आहे. तर १८ जण जखमी झाले होते. तसेच २०१८ मध्ये जानेवारी ते जूनमध्ये ११ अपघात झाले आहे. त्यामध्ये २० जणांचा मृत्यू झाला आहे. रूळ ओलांडताना अपघात होणे नित्याची बाब आहे. काही दिवसांपूर्वीच एक्स्प्रेसने दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला होता. फाटक बंद झाल्यानंतरही गावकरी वाहने घेऊन रूळावर उभे राहतात. दिवा येथील रेल्वे फाटकामुळे उपनगरी रेल्वेच्या वेळापत्रकावर विपरीत परिणाम होतो. तसेच रेल्वे रूळ ओलांडताना अनेक अपघात होऊन् प्रवाशांचे नाहक बळीही गेलेले आहेत. त्यामुळे हे फाटक बंद करण्यासाठी येथे रेल्वे उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय मध्य रेल्वे आणि ठाणे महापालिकेने काही वर्षापूर्वी घेतला होता. त्या कामाला मंजुरी मिळाली आहे. रेल्वे रूळांवरील उड्डाणपुलाच्या भागाचे काम रेल्वे तर दोन्ही बाजुंकडील काम हे महापालिका करणार असून पुलासाठी अंदाजे ५० कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. मात्र दिवा रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला लवकरच सुरूवात होणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
खाजगी रुग्णवाहिका हवी
दिवा रेल्वे फाटकाजवळ दररोज एक अपघात होत असतो. प्रवाशांचा अपघात झाल्यानंतर खासगी रूग्णवाहिका बोलावून जखमींना सिव्हिल अथवा मुंबईच्या रूग्णालयात नेण्यात येते. रेल्वे स्थानकात २४ तास रूग्णवाहिका असली पाहिजे. त्यामुळे जखमींना तातडीने नेता येईल. खासगी रूग्णवाहिकेची वाट बघण्याची गरज भासणार नाही. अनेक प्रवासी कानात इअर फोन घालून रस्ता क्रॉसिंग करतात ,त्यामुळे अपघात होत असतात. रेल्वे फाटक बंद झाल्याशिवाय अपघातांवर नियंत्रण येणार नाही असे एका पोलिसाने सांगितले.