उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे काही काळ प्रसिद्धी माध्यमांपासून दूरच होते. पण आता त्यांनी ट्विट करत मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असून शरद पवार आमचे नेते असल्याचे म्हटले आहे. तसेच भाजप-राष्ट्रवादी मिळूनच राज्याला स्थिर सरकार देऊ शकतात, असेही अजित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्याआधी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले असून राज्यात स्थिर सरकार देऊ, असा शब्दच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांनी आपल्या ट्विटरचं स्टेटस बदलून आपल्या नावापुढं उपमुख्यमंत्री म्हणून संबोधलं आहे.
There is absolutely no need to worry, all is well. However a little patience is required. Thank you very much for all your support.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 24, 2019
I am in the NCP and shall always be in the NCP and @PawarSpeaks Saheb is our leader.
Our BJP-NCP alliance shall provide a stable Government in Maharashtra for the next five years which will work sincerely for the welfare of the State and its people.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 24, 2019
अजित पवार यांना राष्ट्रवादीत परत आणण्यासाठी मनधरणी सुरु असताना अजित पवार दुपार पासून ट्विटरवर सक्रिय आहेत. यावेळी त्यांनी लागोपाठ तब्बल २१ ट्विट केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. तसेच महाराष्ट्रात स्थिर सरकार देऊ असे म्हटले आहे. त्यानंतर केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी भाजपचे अमित शाह यांच्यासह भाजपचे नेते नितीन गडकरी, निर्मला सीतारमण, स्मृति इराणी, राजनाथ सिंह, पियुष गोयल, जे. पी. नड्डा, सदानंद गौडा, मुख्तार अब्बास नकवी, गजेंद्र सिंह शेखावत, सुरेश प्रभू, गिरीश बापट, विजय रुपाणी, मनसुख मांडवीय, अनुराग ठाकूर, धर्मेंद्र प्रधान, बी. एल. संतोष, रवी किशन, डॉ. हर्षवर्धन यांच्यासह आरपीआयचे रामदास आठवले आणि अमृता फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
अजित पवारांनी स्टेटस बदलले
दरम्यान अजित पवार यांनी ट्विटरवर आपले स्टेटस देखील बदलले आहे. या स्टेटसमध्ये त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असे म्हटले आहे.