शिवसेनेचे नेते संजय राऊत आज, १५ नोव्हेंबर रोजी ५८ वा वाढदिवस साजरा करत असून आजही त्यांनी सकाळीच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राऊत यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असा पुनरुच्चार केला. दरम्यान, मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, असं आम्ही म्हणणार नाही. आम्ही कायम सत्तेत राहू, ये-जा करणार नाही, असा टोलाही त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
काय म्हणाले संजय राऊत
महाराष्ट्र सध्या विकास आणि पायाभूत सुविधांमध्ये अग्रस्थानी आहे. तरीही पायाभूत सुविधा आणि ओला दुष्काळ यावर अधिक काम करावं लागणार आहे. तुम्ही पुढील पाच वर्ष काय घेऊन बसलात. पुढची २५ वर्ष राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल. काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. लवकरच त्याला अंतिम रूप दिले जाणार आहे. नवे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालणार आहे. राज्याच्या हित या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी असेल.
Sanjay Raut, Shiv Sena: Common Minimum Programme will be in interest of #Maharashtra. pic.twitter.com/WyMxtSFb6L
— ANI (@ANI) November 15, 2019
दरम्यान, त्यांनी शरद पवारांच्या जनसंघाशी असलेल्या सहभागादेखील उल्लेख केला. संजय राऊत म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सुद्धा वेगळ्या विचारधारांचे लोक एकत्र आले होते आणि त्यांनी देश चालवला होता. इतकंच काय, एकेकाळी शरद पवारांनी महाराष्ट्रात पुरोगामी लोकशाही दलाचा प्रयोग केला होता. त्या सरकारमध्ये जनसंघ सहभागी होता. अशी सरकारं देशात अनेकदा बनली आहेत. त्यामुळं तशी कुठलीही अडचण होणार नाही.