नागपूरः विदर्भ वेगळा होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही, अशी भीष्म प्रतिज्ञा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र त्यांचा विवाह झाला. मुलगी झाली. मुलगी आता मोठी झाली. सुखाचा संसार सुरु आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी विधान परिषदेत फडणवीस यांना मारला.
मुंबई, ठाण्याच्या विकासासाठी सुमारे ४५ हजार कोटी रुपयांचे कर्ज शिंदे-फडणवीस सरकारने घेतले. केवळ मुंबई, ठाण्याचाच विकास करायचा आहे का?. या दोन्हा शहरांचा विकास झालाच पाहिजे. मात्र विर्दभाचा अनुषेश भरुन काढण्यासाठी काय तरतुद करण्यात आली. विर्दभ वेगळा करावा, अशी मागणी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी करण्यात आली. विर्दभाची जनता स्वतंत्र होण्यासाठी आंदोलन का करते याचा विचार करायला हवा. ही चुक एकट्या या सरकारची नाही. पण याचा विचार करण्याची आवश्यकता आहे, असा सल्ला खडसे यांनी दिला.
पुढे ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले आहेत. आता ते उप मुख्यमंत्री आहेत. ते विर्दभातले आहेत. स्वतंत्र विर्दभासाठी ते आग्रही होते. विर्दभ वेगळा होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही, अशी भीष्म प्रतिज्ञा फडणवीस यांनी घेतली होती. मात्र त्यांचे लग्न झाले. मुलगी झाली. मुलगी आता मोठी झाली. त्यांचा सुखाचा संसार सुरु आहे.
मात्र सरकारे आणण्यासाठी लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचे व त्यांना फसवण्याचे काम का केले तुम्ही. मग पाळायचे असतात शब्द, असा टोला खडसे यांनी फडणवीस यांना मारला.
५१ हजार पुरवण्या मागण्या या सरकारने केल्या आहेत. मात्र याला वित्तिय शिस्त म्हणत नाही. महाराष्ट्रावर आताच्या घडीला किती कर्ज आहे. त्याचे व्याज किती सरकार भरते, याची माहिती आधी शासनाने द्यायला हवी, अशी मागणी खडसे यांनी केली. रातोरात बदल्या होतात आणि त्या रद्दही केल्या जातात, हे काय सुरु आहे, असा सवालही खडसे यांनी केला.