भारतीय प्रजासत्ताक दिवस हा दरवर्षी २६ जानेवारी रोजी साजरा केला जातो. भारताचे संविधान, संविधान समितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी १९५० पासून भारतीय संविधान अंमलात आले. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला मानवंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि देशाप्रती आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झालेली आहे.
भारताला ब्रिटिश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी अशा अनेक नेत्यांच्या नेतृत्वाखाली भारताचा स्वातंत्र्य लढला गेला. त्यात जहालवादी आणि मवाळवादी असा दोघांचा सहभाग होता. तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे मात्र कायदे हे भारतीय राज्यशासनाच्या १९३५ सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते.
२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसुदा समिती स्थापन केली गेली. या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर केला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला आणि २ वर्षे,११ महिने आणि १८ दिवसांच्या कालावधीनंतर समितीने हा मसुदा अंतिम केला. बरेचसा विचारविमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या ३०८ सदस्यांनी दोन हस्तलिखित प्रती (हिंदी आणि इंग्रजी) २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्या. दोन दिवसांनंतर हे भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले.
दरवर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत, म्हणजे नवी दिल्ली येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते. हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. संचलनाच्या अगोदर शहीद सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणार्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व २१ तोफांची सलामी दिली जाते. राष्ट्रगीत होते. त्यानंतर देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र, हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेली देशातील शूर बालके सजवलेल्या हत्तीवरून किंवा वाहनावरून या संचलनात सहभागी होतात.
भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी), रणगाडे समवेत संचलन करतात. भारताचे राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात. नवी दिल्ली येथे होणार्या संचलनाप्रमाणेच भारतातील सर्व राज्यांतही एकेक संचलन होते. प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याचे राज्यपाल सुरक्षा दलांची मानवंदना स्वीकारतात.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी देशभक्तीपर गीतांच्या ओळी, तिरंंगा ध्वज आदी संंकल्पनांचा कल्पक वापर करून परस्परांना शुभेच्छा दिल्या जातात. देशाभिमान मनात टिकून राहण्यासाठी भारतीय नागरिक अशा शुभेच्छा एकमेकांना देऊन परस्परांमधले ऐक्य टिकवण्यासाठी आजच्या दिवशी कटिबद्ध होतात.