महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगलीतील अनेकांना या भयावह पूरस्थितीचा सामना करावा लागला होता. यानंतर पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. यामध्ये स्थानिक कोल्हापूर आणि सांगलीतील नेते, सामाजिक संघटना, समाजसेवक यांसह महाराष्ट्रातील अनेक लोकं पुढे सरसावून पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंबरोबर आर्थिक सहाय्य देखील करत आहेत. यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार मंडळींनी देखील पुढाकार घेतला आहे.
पूरग्रस्तांच्या १००० मुलीच्या विवाहाची जबाबदारी फाऊंडेशन घेणार
यामध्ये सिने अभिनेत्री दिपाली भोसले-सय्यद फाऊंडेशन कडून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी ५ कोटी रुपयांची मदतीची घोषणा केली आहे. यासोबतच पूरपरिस्थितीचे संकट ओढावलेल्या पूरग्रस्तांच्या १००० मुलीच्या विवाहाची जबाबदारी अभिनेत्री दिपाली सय्यद फाऊंडेशन घेणार असून प्रत्येक मुलीच्या नावाने ५० हजार रुपयांची मुदत ठेव पावती करण्यात येणार आहे.
दरम्यान, दिपाली सय्यद या शनिवार १७ ऑगस्ट रोजी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात जाऊन लोकांना भेट देणार आहे.