घरमहाराष्ट्रदहावीच्या निकालाचा तिढा सुटला

दहावीच्या निकालाचा तिढा सुटला

Subscribe

भूगोल विषयासाठी मिळणार सरासरी गुण

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावी भूगोल विषयाचा पेपर रद्द केला आहे. त्यामुळे भूगोलाची परीक्षा होणार का, झालीच तर निकाल कधी लागणार, असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. या प्रश्नांच्या जंजाळात दहावीचा निकाल अडकलेला असताना गुंत्याचे मूळच शोधण्यात आले आहे. दहावीच्या भूगोल विषयाची परीक्षा न घेता विद्यार्थ्याला इतर विषयात मिळालेल्या गुणांची सरासरी विचारात घेऊन त्यावरून भूगोलाचे गुण निश्चित करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यामुळे आता दहावीचा निकाल लावणे सोपे होणार आहे. मात्र या निर्णयामुळे हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होणार असल्याबद्दल शिक्षक संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावीची परीक्षा ३ ते २३ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेला दहावीचा भूगोल विषयाचा पेपर पुढे ढकलण्यात आला होता. यानंतर लॉकडाऊन वाढवण्यात आल्याने या विषयाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केला. विद्यार्थांना गुणदान करण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाने राज्य शिक्षण मंडळाला कळवले होते. यानंतर मंडळाने भूगोल विषयाचे गुणदान करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो शिक्षण विभागाकडे पाठवला होता. या प्रस्तावातील विद्यार्थ्यांना सरासरी गुणदान करण्याचा निर्णयाला शिक्षण मंडळाने हिरवा कंदील दाखविल्यानंतर राज्य शिक्षण मंडळाने भूगोल विषयाच्या गुणांबद्दल निर्णय जाहीर केला आहे.

- Advertisement -

त्यानुसार विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेत मिळणार्‍या गुणांची सरासरी विचारात घेऊन त्याचे रूपांतर परीक्षा रद्द केलेल्या विषयाच्या परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या गुणांमध्ये करण्यात येणार असल्याचे मंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. भूगोल विषयाच्या परीक्षेसह दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्य शिक्षण विषयाची परीक्षाही रद्द करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांनाही या विषयासाठी सरासरी गुण देण्यात येणार आहेत.

शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या निर्णयावर शिक्षक संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयामुळे हुशार आणि गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. या विद्यार्थ्यांचे गुण कमी होणार असून त्यांचे टक्केही काही प्रमाणात कमी होणार आहेत, असे शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी सांगितले.
गुणवंत विद्यार्थ्यांवर या निर्णयामुळे अन्याय होणार आहे. मंडळाने भूगोल विषयाचे गुण विचारात न घेता निकाल जाहीर करणे अपेक्षित होते. या निर्णयाला पालक न्यायालयात आव्हान देऊ शकतील, असे मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी सांगितले.

- Advertisement -

यंदा फेरपरीक्षा संकटात
बारावी परीक्षेचा निकाल दरवर्षी मे अखेरीला किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतो. त्यापाठोपाठ दहावीचा निकाल जाहीर केला जातो. परंतु यंदा करोनामुळे पेपर तपासणीचे काम रखडल्याने निकाल वेळेत लागणे अवघड झाले आहे. हे निकाल लांबल्यास दहावी, बारावीची जुलै महिन्यात होणारी फेरपरीक्षा घेणे कठीण होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -