काही दिवसांपूर्वी देशाच्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक झाली. या पाचही राज्यांमध्ये भाजपचा फज्जा उडाला. या निवडणुकीनंतर आता सर्व लोकांचे लक्ष हे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीकडे लागलेले आहे. या निवडणुकीची घोषणा मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे. केंद्रिय निवडणूक आयोगाने देशातील सर्व राज्याच्या निवडणूक आयोगांना फेब्रुवारी अखेरपर्यंत तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. ही निवडणूक ६ ते ७ टप्प्यामध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपचा प्रचार कसा असेल?
सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरु आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपला एकाही ठिकाणी सत्ता मिळाली नाही. त्यामुळे या निवडणूकीतून शिकून भाजप पुढच्या प्रचाराच्या पाऊलवाटा कशा असतील? हे पाहणंदेखील औत्सुक्याचे ठरेल. दरम्यान, ही लोकसभा निवडणुकाची तारीख काय? किती टप्प्यांमध्ये होईल? आणि निकाल कधी लागेल? याबद्दल अजून माहिती मिळालेली नाही. परंतु, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
Sources: Election Commission of India to announce the 2019 Lok Sabha election schedule in the first week of March, election would be held in 6 to 7 phases
— ANI (@ANI) January 18, 2019
कोण कुणावर कुरघोडी करेल?
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकवेळी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमध्ये चुरशीची लढाई झाली. यावेळी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी काँग्रेसच्या नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आई-वडिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले होते. तर, भाजपकडूनही काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर आरोप केले जात होते. येत्या लोकसभा निवडणुकीतही आरोप-प्रत्यारोपाचेच प्रचार होतील का? कि, यातून शिकून भाजप वेगळ्या प्रचाराची पद्धत वापरेल, हे पाहाणे महत्त्वाचे ठरेल. दरम्यान, काँग्रेसने या निवडणुकीच्या आधी जाहिरनामा बनवायला सुरुवात केली आहे. या जाहिरनाम्यासाठी राहुल गांधी यांनी तज्ज्ञ लोकांच्या भेटी घेतल्या होत्या. यापैकी आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची भेट त्यांनी घेतली होती.