नाशिकमधील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी (दि.4) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विनायक मेटे म्हणाले, राज्यपालांनी अतिवृष्टीग्रस्तांना हेक्टरी आठ हजार रुपयांची मदत जाहीर केलेली असताना उद्धव ठाकरे यांनी 25 हजार रुपये मदतीचे आश्वासन दिले होते. त्याचप्रमाणे शेतकरी कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते. परंतु, आता ते प्रत्यक्षात सत्तेत असताना त्यांना या सर्व आश्वासनांचा विसर पडल्याचे दिसत आहे. सरकारमध्ये अनेक मतभेद असल्याने हे सरकार दीर्घकाळ चालण्याचे संकेत नाही. अशा स्थितीत मुख्यमंत्री कर्जमुक्तीची घोषणा कधी करणार? असा सवाल उपस्थित करतानाच शिवसेनेने शिवजयंतीच्या बाबतीतही दुटप्पी भूमिका सोडून तारखेप्रमाणेच शिवजयंती साजरी करावी, असे आवाहन त्यांनी केले. यासाठी 19 फेब्रुवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतानाच शिवसेनेचे पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांना तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.