दक्षिण अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे सध्या एका वक्तव्यामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले दोन हजार रुपये तुम्हाला चालतात, मग मत देताना कमळ का चालत नाही? ज्यांना भाजपला मत द्यायचे नसेल त्यांनी मोदींनी दिलेले दोन हजार रुपये परत द्यावेत”, असे अजब वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी राम शिंदे यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत केले आहे. आता शेतकऱ्यांनी या वक्तव्यावर संताप व्यक्त केला असून सुजय विखेंना दोन हजारांचा धनादेश पाठवला आहे.
कर्जत जामखेड या मतदारसंघात बोलत असताना सुजय विखेंनी हे वक्तव्य केले होते. कर्जत जामखेड येथे विरोधी उमेदवाराच्या सभेला गर्दी करणाऱ्या लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दोन हजार रुपयांचा धनादेश घेतलेला आहे. जर कमळाला मत द्यायचे नसेल तर ते पैसे परत करा, त्यातून विकासकामे करता येतील, असे वक्तव्य सुजय विखे यांनी केले होते. या वक्तव्याचा लोणी येथील छात्रभारती संघटनेकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या मतांची किंमत लावून सुजय विखेंनी अपमान केला आहे, विधानसभेला कमळ सोडून कुणालाही मतदान करावे, असे आवाहन छात्रभारतीच्यावतीने करण्यात आले आहे.