राहुल गांधी यांनी दिल्लीतील रामलीला मैदानात आज स्वा. सावरकरांचे नाव घेत आक्षेपार्ह विधान केले. त्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेत राहुल गांधींनी देशवासीयांची माफी मागावी अशी मागणी केली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील राहुल गांधी यांना फटकारले आहे. ट्विटरवर ट्विट करत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “स्वतःला गांधी समजण्याची घोडचूक करु नये. केवळ गांधी आडनाव असल्याने कुणी ‘गांधी’ होत नाही”, असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे विधान निंदनीय असल्याची टिका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
हेही वाचा – …अन्यथा आम्हाला तोंड लपवावे लागले असते; रणजित सावरकरांचा काँग्रेसवर हल्लाबोल
देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून राहुल गांधी यांना फटकारले आहे. त्यांनी म्हटले की, राहुल गांधी यांचे हे विधान अतिशय निंदनीय आहे. ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नखाचीही बरोबरी करू शकत नाहीत. त्यांनी स्वत:ला गांधी समजण्याची घोडचूक अजिबात करू नये. केवळ गांधी आडनाव असल्याने कुणी ‘गांधी’ होत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्याबद्दल अशी भाषा वापरणे, हा तमाम देशभक्तांचा अवमान आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे, असे फडणवीस यांनी म्हटले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे विधान अतिशय निंदनीय आहे.
ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नखाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही आणि स्वतःला 'गांधी' समजण्याची घोडचूक तर त्यांनी अजिबात करू नये!
केवळ आडनाव गांधी असल्याने कुणी 'गांधी' होत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे !— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 14, 2019
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या जीवनाची आहुती मातृभूमीसाठी दिली. सर्वस्व अर्पण केले.
त्यांच्याबद्दल अशी भाषा वापरणे, हा देशासाठी परमोच्च त्याग करणाऱ्या तमाम देशभक्तांचा अवमान आहे.
त्यामुळे आता आणखी एका विधानासाठी राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे.— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 14, 2019
हेही वाचा – सुज्ञांस अधिक सांगणे न लगे; संजय राऊतांचा राहुल गांधींना इशारा
राहुल गांधी यांचे वादग्रस्त विधान
‘रेप इन इंडिया’ या आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी, या भाजपाच्या मागणीवर राहुल गांधी यांनी भाष्य केले. “माझं नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. त्यामुळे मी कदापी माफी मागणार नाही,” अशा शब्दात त्यांनी आपली भूमिका मांडली. रामलीला मैदानावर सुरू असलेल्या काँग्रेसच्या ‘भारत बचाव रॅली’दरम्यान त्यांनी हे वादग्रस्त विधान केले.