“छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन्ही मानाच्या गाद्या सध्या भाजपमध्ये आहेत. भाजपने छत्रपतींची तुलना मोदींसोबत केली आहे. त्यावर छत्रपतींच्या वशंजाची भूमिका काय आहे? एवढाच प्रश्न मी काल विचारला होता. त्यात चिडायला काय झालं? छत्रपतींच्या मानसन्मानासाठी आम्ही लढूच आम्ही शिवसैनिक आहोत. मात्र स्वतःला वशंज माननारे लोक काय करणार आहेत? भाजपमध्ये असलेल्या छत्रपतीच्या वशंजांनी तात्काळ राजीनामे द्यायला हवेत”, अशी मागणी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. आज पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी खासदार संभाजीराजे भोसले यांच्यावर पलटवार केला.
महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना केल्याचा प्रकार काल भाजपच्या दिल्लीतील कार्यालयात घडला. जय भगवान गोयल या भाजपच्या नेत्याने ‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ हे पुस्तक लिहिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या विषयावरुन थेट छत्रपतींच्या वशंजांनाच डिवचले होते. त्यानंतर कोल्हापूर गादीचे छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांनी ट्विट करत ‘संजय राऊत यांच्या जिभेला लगाम उद्धव ठाकरे यांनी लगाम घालावा’ असे म्हटले होते.
मा.छत्रपती संभाजी राजे
आम्ही आपला नेहमीच आदर करतो..संजय राऊत यांनी असे कोणते विधान केले ?ज्या मुळे छत्रपती घराणयाचा अवमान झाल?हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने च चालत आहे. सदैव चालत राहिल.धन्यवाद आणि जय महाराष्ट्र— Sanjay Raut (@rautsanjay61) January 12, 2020
भाजपचे नेते काय भूमिका घेतात याकडे लक्ष
आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, या विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झालेली आहे. माझी भूमिका योग्य असल्याचे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जर जनता भूमिका घेत आहे. तर वशंजांनीही भूमिका घ्यायला हवी. महाराष्ट्रातील भाजपचे नेते आज संध्याकाळपर्यंत भूमिका जाहीर करतील, अशी अपेक्षा आहे.इतरवेळी भाजपचे नेते तात्काळ भूमिका मांडत असतात मग तो सावरकर यांचा विषय असो किंवा इतर विषय असो.
पंतप्रधानांना दोष नाही, चमकू नेत्यांनी हे केले
भाजपवर आरोप करत असतानाच संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मात्र टीका करणे टाळले आहे. ते म्हणाले की, “पंतप्रधानांना आम्ही दोष देणार नाही, चमकूगिरी करणाऱ्या नेत्यांमुळे प्रमुख नेते अडचणीत येतात. ज्याने पुस्तक लिहिले आहे. त्या व्यक्तिने १५ वर्षांपूर्वी महाराष्ट्र सदनावर हल्ला केला होता. असा माणूस भाजप मुख्यालयात जाऊन शिवाजी महाराजांचा अपमान करतो, अशा माणसावर जर महाराष्ट्रातील भाजप नेते जर बोलत नसतील तर त्यांनी महाराष्ट्राचे राजकारण सोडून द्यावे. महाराष्ट्रातील भाजपचे नेते शिवाजी महाराजांचे स्मारक बांधायला निघाले होते. बरं झालं तुमच्या राज्यात शिवस्मारक होत नाही.” अशी टीका संजय राऊत यांनी केली.