पश्चिम रेल्वेच्या कामातून निवृत्त झालेल्या एका सरकारी कर्मचाऱ्याने केलेल्या अवयवदानामुळे तिघांना जीवदान मिळालं आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून अवयवांच्या प्रतिक्षेत असणाऱ्या तिघांना अवयव दान करण्यात आले आहेत. मुंबई सेंट्रल येथील जगजीवनराम रेल्वे रुग्णालयात अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यात कुटुंबीयांनी दोन मूत्रपिंड, यकृत आणि कॉर्निया हे अवयव दान केले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कर्मचाऱ्याचं मुंबई सेंट्रलच्या जगजीवन राम रेल्वे रुग्णालयात अवयवदान करण्यात आलं आहे.
मुंबईतील सलग २८ वं अवयवदान
तसंच, यंदाच्या वर्षातील मुंबईतील हे सलग २८ वं अवयवदान आहे. पश्र्चिम रेल्वेत अनेक वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या एका ६४ वर्षीय कर्मचाऱ्याचे अवयवदान करण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्याचं नाव सुरेश जगताप आहे. काही वर्षांपूर्वीच ते सेवेतून निवृत्त झाले होते. पण, प्रकृती संदर्भात समस्या जाणवू लागल्याने ९ जुलैला त्यांना उपचारासाठी मुंबई सेंट्रलच्या रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वैद्यकीय तपासणीत त्यांना हृदयासंदर्भात आजार असल्याचं निदान झालं. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केलं. पण, १४ जुलैला डॉक्टरांनी त्यांना ब्रेनडेड घोषित केलं. त्यानंतर डॉक्टरांनी याबाबत नातेवाईकांना माहिती दिली आणि अवयवदान करण्याची परवानगी मागितली. कुटुंबीयांनी क्षणाचाही विलंब करता लगेचच त्यांच्या अवयवदानासाठी संमती दिली. त्यानुसार यकृत, दोन्ही मूत्रपिंड आणि कॉर्निया दान करण्यात आले आहे.
डॉक्टरांनी दिली होती कल्पना
या अवयवदानाविषयी जगजीवन राम रेल्वे रुग्णालयातील अतिरिक्त आरोग्य संचालक आणि हृदयरोग तज्ज्ञ डॉ. एम.वेंकटेश रेड्डी यांनी सांगितलं की, या कर्मचाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण, उपचारादरम्यान त्यांचं ब्रेन हॅमरेज झालं. त्याची कल्पना त्यांच्या नातेवाईकांना दिली. त्यानंतर या रूग्णाचे यकृत, मूत्रपिंड व कॉनिया हे अवयव दान केले गेले. १६ जुलैला दोन्ही मूत्रपिंड अपोलो रुग्णालयातील रुग्णांना दान करण्यात आली. तर, यकृत केईएम रुग्णालयात पाठवण्यात आलं. कॉर्निया एका नेत्रपेढीला दान केलं. शिवाय, अवयवदानाची प्रक्रिया पार पडणारं जगजीवन राम रेल्वे रुग्णालय हे मुंबईतील पहिलं रुग्णालय असल्याचा दावाही डॉ. रेड्डी यांनी केला आहे.