राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्ली हिंसाचारावरून भाजपवर तोफ डागली आहे. देशातील जनतेला भाजपकडून विकास मॉडेल अपेक्षित होता, गुजरातचा दंगल मॉडेल नाही, असे खडेबोल सुनवत असतानाच २००२ ची पुनरावृत्ती होऊ नये, याची काळजी राज्यकर्त्यांनी घ्यायला हवी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
दिल्लीत जे काही सुरू आहे ते अत्यंत धक्कादायक आहे. देशातील जनतेला भाजपकडून विकास मॉडेल अपेक्षित होता, गुजरातचा दंगल मॉडेल नाही. २००२ची पुनरावृत्ती होऊ नये, याची काळजी राज्यकर्त्यांनी घ्यायला हवी.#DelhiBurning #DelhiRiots #delhivoilencehttps://t.co/4dPEIlABov
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) February 25, 2020
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत भेटीवर असतानाच राजधानी दिल्लीत हिंसाचार उफाळला आहे. दिल्लीच्या जाफराबाद परिसरात काल (२४ फेब्रुवारी) भडकलेल्या हिंसेनंतर संपूर्ण दिल्लीमध्ये तणावाचे वातावरण आहे. कालच्या हिंसाचारात दिल्लीच्या एका पोलीस शिपायासह ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर उत्तर-पूर्व दिल्लीच्या बऱ्याच भागांमध्ये १४४ कायद्याअंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकरणावर जयंत पाटील यांनी हे सगळे धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया ट्विटरवर दिली आहे.
दिल्लीत सीएए विरोधक आणि समर्थकांमध्ये अजूनही धुमश्चक्री सुरुच आहे. आतापर्यंत दिल्ली हिंसाचारात १० जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्लीत १४४ कलम लागू करत महिन्याभरासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मौजपूर भागात दुपारच्या सुमारास पुन्हा दगडफेक करण्यात आली. यावेळी जमावाने दोन पत्रकारांसोबत धक्काबुक्की केली. यामध्ये महिला पत्रकाराचा समावेश आहे.