अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या (sushant singh rajput suicide) प्रकरणाला गेल्या महिन्याभरापासून रोज नवनवीन ट्वीस्ट येत असल्यामुळे या प्रकरणाचं गूढ अजूनच वाढलं आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत चित्रपटसृष्टीतल्या अनेक दिग्गजांची चौकशी झाली असून आता यात CBI आणि ED यांनी देखील चौकशी सुरू केली आहे. आधी मुंबई पोलीस, नंतर बिहार पोलीस (Bihar police), नंतर सीबीआय आणि आता ईडी यांच्या प्रवेशामुळे सुशांतच्या आत्महत्येचा गुंता सुटण्याऐवजी वाढतच चालला आहे. या पार्श्वभूमीवर सुशांतच्या मानसिक स्थैर्याविषयी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून त्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. त्यात आता टिप्ससारख्या अवाढव्य निर्मिती ब्रॅण्डचे रमेश तौरानी यांनी आता यामध्ये आपलं मत मांडलं असून ‘सुशांतच्या मृत्यूच्या एक दिवस आधीच मी त्याच्याशी १५ मिनिटं बोललो होतो’, असा दावा तौराणी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये केला आहे.
‘१५ मिनिटांच्या कॉलमध्ये कसं ओळखणार?’
एका इंग्रजी दैनिकाच्या पत्रकाराने त्यांना फोनवर विचारलेल्या प्रश्नांना तौरानी यांनी या पोस्टमध्ये स्पष्टीकरण दिलं आहे. ‘होय, सुशांतसोबत त्याच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी म्हणजे १३ जूनला मी बोललो होतो. निखिल आडवाणी आणि मी सुशांतला कॉन्फरन्स कॉल केला होता. यामध्ये मी त्याला एका चित्रपटाची कॉन्सेप्ट सांगितली. ती त्याला आवडली देखील होती. १५ मिनिटं आमची चर्चा झाली. पण त्या कॉन्सेप्टवर आमची फक्त प्राथमिक चर्चा झाली होती. आणि व्यावसायिक कामासाठी झालेल्या फोनवरच्या संभाषणात समोरची व्यक्ती मानसिक दृष्ट्या कशी आहे, हे कसं समजणार?’ असा सवाल तौरानी यांनी विचारला आहे. ‘चित्रपटसृष्टीविषयी चुकीच्या समजुतींना हवा देण्यापेक्षा माझी सगळ्यांना विनंती आहे की सिस्टीमवर विश्वास ठेवा आणि तपास यंत्रणांना त्यांचं काम करू द्या’, असं देखील तौरानी यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सुशांतसिह राजपूत आत्महत्या प्रकरणात आत्तापर्यंत अनेक दिग्गज सेलिब्रिटिंचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. सुशांतच्या वडिलांनी पाटणा पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू असून ईडीने देखील रिया चक्रवर्ती (rhea chakraborty) आणि तिच्याशी संबंधित व्यक्तींची चौकशी केली आहे. यामध्ये राजकीय वाद देखील सुरू झाला असून भाजपकडून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केलं जाऊ लागलं आहे. त्यामुळे नक्की सुशांतच्या मृत्यू प्रकरणात घडलं काय? हा प्रश्न मात्र दिवसेंदिवस अधिकाधिक गुंतागुंतीचा बनू लागला आहे.