मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आज पत्रकार परीषद घेऊन वृत्तवाहिन्या पैसे देऊन आपले रेटिंग वाढवत असल्याचे रॅकेट उघड केले. यावेळी त्यांनी रिपब्लिक वृत्तवाहिनेकडे अंगुलीनिर्देश करत त्यांची चौकशी करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर रिपब्लिक वृत्तावाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्यावर केलेले आरोप निराधार असून आम्ही सुशांत सिंग आणि पालघर प्रकरणात सत्याचा पाठपुरावा केल्यामुळेच आम्हाला टार्गेट केले जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सांगगण्यावरुन ही कारवाई केली असल्याचा आरोप करत परमबीर सिंग यांना पोलिसांचा गणवेश घालण्याचा अधिकार नाही”, अशी आगपाखड अर्णब गोस्वामी यांनी केली आहे.
रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीवर लाईव्ह येत अर्णब गोस्वामी यांनी परमबीर सिंग यांना कोर्टात खेचणार असून फौजदारी खटला दाखल करणार असल्याचे आव्हान दिले आहे. तसेच त्यांनी इतर स्पर्धक वृत्तवाहिन्यांवर देखील आरोप केले आहेत. परमबीर सिंग यांच्या खोट्या आरोपांवर काही वृत्तवाहिन्या माझ्याविरोधात बातम्या देत आहेत, त्यांना देखील आपण कोर्टात खेचणार, असे वक्तव्य अर्णब गोस्वामी यांनी केले आहे.
हे वाचा – फेक अकाऊंटनंतर मुंबई पोलिसांकडून TRP रॅकेट उघड; रिपब्लिक टीव्हीचे नाव समोर
BARC ने रिपब्लिक टीव्ही कोणताही आरोप केलेला नाही किंवा आमचे नावही टीआरपी घोटाळ्यात घेतले नसताना परमबीर सिंग कोणत्या आधारावर आमच्यावर आरोप करत आहेत, असा प्रतिप्रश्न अर्णब यांनी विचारला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या इशाऱ्यानंतरच कणा नसलेले मुंबई आयुक्त जाणुनबुजून माझ्या विरोधात खोटा प्रचार करत असल्याचा आरोप गोस्वामी यांनी यावेळी केला.
रिपब्लिक टीव्हीने CAA आणि हाथरस प्रकरणात सत्याला धरुन रिपोर्टिंग केल्याचा दावा गोस्वामी यांनी केला आहे. सीएए आणि हाथरस प्रकरणात त्यांनी काँग्रेसवर आरोप केले आहेत. काँग्रेस या प्रकरणाचा राजकीय फायदा उचलणार होती, मात्र आम्ही सत्य बाहेर काढल्यामुळे तो प्रयत्न फसला असाही दावा गोस्वामी यांनी केला आहे.