गॅबावर ३२ वर्षांत पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाला पराभूत करणे आणि कसोटी मालिका जिंकणे या दुहेरी यशाबाबतच्या भावना शब्दांत मांडणे अवघड आहे, असे भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणे चौथ्या कसोटीनंतर म्हणाला. पहिल्या कसोटीनंतर भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली वैयक्तिक कारणामुळे मायदेशी परतला आणि त्याच्या अनुपस्थितीत रहाणेला भारताचे कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली. या संधीचे रहाणेने सोने करत भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. भारताची चौथ्या कसोटीतील कामगिरी फारच विशेष ठरली. गॅबावर ऑस्ट्रेलियन संघाला तब्बल ३२ वर्षांनंतर कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला. रिषभ पंतची आक्रमक खेळी, तसेच वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर या युवा खेळाडूंच्या अष्टपैलू योगदानांमुळे भारताने हा कसोटी सामना ३ विकेट राखून जिंकला.
Proud to be a part of this unit 🇮🇳 pic.twitter.com/bZZupXEAfE
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) January 19, 2021
हा मालिका विजय आमच्यासाठी विशेष आहे. या यशाचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मला आमच्या प्रत्येक खेळाडूचा आणि त्यांनी केलेल्या कामगिरीचा अभिमान आहे. आम्ही निकालाचा फारसा विचार करत नव्हतो. आमचा केवळ चांगला खेळ करण्याचा प्रयत्न होता. चेतेश्वर पुजाराचे कौतुक झाले पाहिजे. त्याच्या संयमी खेळीमुळे इतर खेळाडूंवरील दडपण कमी झाले. अखेरीस रिषभ पंतने अप्रतिम फलंदाजी करत आम्हाला विजय मिळवून दिला, असे रहाणे म्हणाला. तसेच त्याने पुढे सांगितले, कसोटी सामना जिंकण्यासाठी २० विकेट घेणे सर्वात महत्वाचे असते. त्यामुळे आम्ही पाच गोलंदाजांना खेळवण्याचा निर्णय घेतला. वॉशिंग्टन सुंदरमुळे आमचा संघ संतुलित झाला.
हेही वाचा – बॉर्डर-गावस्कर करंडक भारताकडे