मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता राज्य सरकार कडक निर्बंध घालण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी मुंबईतील ओशिवरा पोलीस स्टेशनजवळ स्थानिक हॉटेल व्यावसायिकांनी लॉकडाऊन आणि निर्बंधांविरोधात निदर्शने केली. या हॉटेल व्यावसायिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी काँग्रेस नेते संजय निरूपम हे त्या ठिकाणी उपस्थित होते. तसेच निरुपम यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. कोरोनाशी आपल्याला लढायचे आहे याबाबत दुमत नाही. मात्र, लढण्यासाठी आधी जगणे महत्वाचे आहे. परंतु, विविध निर्बंध घालून लोकांचा धंदा बंद केला जात असल्याने बेरोजगारी पुन्हा वाढण्याची भीती आहे. व्यवसाय बंद पडतील आणि संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडून जाईल, असे निरुपम म्हणाले.
नागरिक काळजी घेण्यास तयार
कोरोनामुळे याआधीही लॉकडाऊन करण्यात आले होते. त्या लॉकडाऊनमुळे लोकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या नावाखाली जो तमाशा सुरू आहे, तो बंद व्हायला हवा. लॉकडाऊनची आवश्यकता नाही. काही सावधानता बाळगण्यासाठी हॉटेलवाले तयार आहेत. मुंबईचे नागरिकही काळजी घेण्यास तयार आहेत. त्यामुळे लॉकडाऊनची आवश्यकता नाही, असे निरूपम म्हणाले.
ही परिस्थिती मुंबईसाठी चांगली नसेल
मागच्यावेळी लॉकडाऊन असताना मोठ्या प्रमाणात स्थलांतरित मजुरांना मिळेल त्या मार्गाने आणि साधनाचा वापर करून मुंबईहून आपल्या गावी जावे लागले होते. आता पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाली, तर लोकांना बेरोजगार होऊन गावी जावे लागू शकते. ही परिस्थिती मुंबईसाठी व मुंबईच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगली नसेल, असेही निरूपम यांनी नमूद केले.